-तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या दूरदृष्टीतून साकारलेला कोकणातील सर्वात मोठा सरकारी प्रकल्प
राजेंद्र शिंदे / चिपळूण
कोकण रेल्वेचा कायापालट करणारे तत्कालीन रेल्वेमंत्री, कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू यांच्या दूरदृष्टीतून खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीच्या विस्तारित टप्प्यातील असगणीच्या माळरानावर रेल्वेचा रोलिंग स्टॉक कंपोनंट प्रकल्प सध्या आकार घेत आहे. भविष्यात कोकणच्या प्रगतीत महत्वाचे योगदान देणारा हा प्रकल्प कोकणातील एकमेव व मोठा सरकारी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम मध्यंतरी पोटठेकेदारामुळे रेंगाळले असले तरी आता खुद्द टाटा प्रोजेक्ट कंपनीने काम हाती घेत त्याला गती दिल्याने पुढील वर्षी उत्पादनाला सुरूवात होईल, अशी शक्यता आहे.
तत्कालीन रेल्वेमंत्री प्रभू यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कालखंडात आर्थिक विवंचनेत असणाऱया रेल्वेला आधुनिकतेची जोड देऊन रेल्वेचा पूर्ण चेहराच बदलून टाकला. आत्मनिर्भर रेल्वे, आत्मनिर्भर भारत हे समीकरण जुळवून आणून जगाचे लक्ष रेल्वेकडे आकर्षित केले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक गुंतवणूक जागतिक दर्जावर सुरु झाली व आधुनिकतेचे तंत्रज्ञान भारतात येऊ लागले. प्रभू यांच्यामुळे काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या कोकण रेल्वेलाही आर्थिक सुबत्ता आणली. नवनवीन बदलाबरोबरच आवश्यक रेल्वेस्थानके, त्यांचे आधुनिकीकरण, रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, दुपदरीकरणाला खऱया अर्थाने गती मिळाली.कोकणात एमआयडीसीच्या अतिरिक्त लोटे विस्तारित टप्प्यात उभा रहात असलेला आधुनिक रेल्वे कोच (डबे) व रेल्वे व्हील बनवण्याचा कारखाना हा त्यांच्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तथा एमआयडीसीने खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीच्या 650 हेक्टर विस्तारित क्षेत्र नव्या प्रकल्पासाठी विकसित करण्याच्यादृष्टीने पावले टाकल्यानंतर सप्टेंबर 2016मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांच्याहस्ते या रेल्वेच्या रोलिंग स्टॉक कंपोनंट कारखान्याचे भूमिपूजन झाले. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या उभारणीच्यादृष्टीने तब्बल 10 महिन्यांनी अंतर्गत कामाच्या निविदा प्रसिध्द झाल्या.
सुमारे 50 एकर क्षेत्रावरील प्रकल्प
सुमारे 50 एकर क्षेत्रावर 450 कोटी रूपये खर्चून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प कोकणातील सर्वात मोठा व पहिलाच सरकारी प्रकल्प आहे. आजपर्यंत कोकणात रासायनिक कारखान्यांनी वातावरण काळवंडलेले असताना हा प्रकल्प मात्र त्याला अपवाद ठरणारा आहे. तसेच या प्रकल्पामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे. परिसराचा कायापालट करणाऱया या प्रकल्पात वेल्डर, मोल्डींग टेक्निशियन, वायरमन, रंगारी, प्लंबर, फोम मेकर, फिटर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर तब्बल 10 महिन्यांनी त्याच्या संरक्षक भिंती उभारण्याच्या निविदा निघाल्या. आर्थिक तरतूद अगोदरच करण्यात आलेली असल्याने त्यानंतर पुढे प्रत्यक्षात प्रकल्प उभारणीला प्रारंभ झाला. गेले दीड वर्ष कोरोना महामारीचा कामावर परिणाम झालेला असला तरी प्रत्यक्षात उभारणीत थोडीफार ढिलाई पडली. कारण गेल्या अडीच वर्षापासून या प्रकल्प उभारणीचे काम करणाऱया टाटा प्रोजेक्ट कंपनीने एस.टी.सी. कन्स्ट्रक्शन कंपनीला पोटठेकेदार नेमले. पुढे या कंपनीने काही स्थानिक व्यावसायिकांना कामे दिली. स्थानिक व्यावसायिकांनी ही कामे पूर्ण करूनही एस.टी.सी. कंपनीने त्यांना त्यांचा मोबदलाच दिलेला नाही. कंपनीने 2 कोटीहून अधिक देणी 35 व्यावसायिकांची थकवली आहेत. आर्थिक कोंडीत अडकलेल्या या व्यावसायिकांनी गेल्या डिसेंबर महिन्यात या विरोधात उपोषणही केले. मात्र तारीख पे तारीख आणि बेलापूर येथील कोकण रेल्वे कार्यालयातून वारंवार बैठका होऊनही आजपर्यंत उपयोग होताना दिसत नाही. आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात देणी देण्याचे निश्चित केले आहे.
तसे पाहिले तर पोटठेकेदार कंपनीने थकवलेल्या या देण्यामुळे प्रत्यक्षात उभारणीच्या कामावर चांगलाच परिणाम झाला आहे. मात्र आता प्रत्यक्षात टाटा कंपनीने काम हाती घेऊन त्यामध्ये कामाला सध्या गती दिली आहे. सध्या 300हून अधिक कामगार येथे काम करत आहेत. कामाची गती वाढल्यास पुढील वर्षापर्यंत या प्रकल्पातून उत्पादन सुरू होऊ शकते.