प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील असगणी-लवेलच्या वेशीवर गत आठवडय़ात घातक रसायन ओतल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा याच ठिकाणी घातक रसायन ओतण्याची पुनरावृत्ती झाली आहे. या रसायनामुळे पाणी प्रदूषित होऊन नजीकची झाडे जळून खाक झाली. या ठिकाणी सातत्याने अज्ञात टँकरचालक घातक रसायन ओतून पलायन करत असून ग्रामस्थांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गत आठवडय़ात असगणी व लवेल सीमेलगतच्या नदीत अज्ञाताने घातक रसायन ओतले होते. नदीपात्रातील पाणी दूषित होऊन मासेही मृत्यूमुखी पडले होते. असगणीचे सरपंच अनंत नायनाक व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी भेट देत रसायन ओतणाऱयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. याचमुळे अज्ञात टँकर चालकाने पुन्हा याच ठिकाणी घातक रसायन ओतून पलायन केले. सतत घडणाऱया या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे. प्रशासन ही बाब गंभीरपणे का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित करत कारवाईसाठी प्रशासन चालढकलपणा करत असेल तर ते कदापी खपवून घेणार नाही, असा इशाराही संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.