घराचे कर्ज फेडणारा, गहाणवट टाकलेले सोने परत मिळवणारा आणि घराला प्रगतीच्या दिशेने नेणारा जर एखादा सुपुत्र निपजला तर त्याची गणना कर्तबगार आणि कुळाच्या भाग्यविधात्यांमध्येच होते. मात्र 1991 साली केवळ पुढचे दहा दिवस देश चालेल इतकाच म्हणजे दोन हजार कोटींचा साठा तिजोरीत शिल्लक असताना, देशाचे सगळे सोने गहाण पडलेले असताना आणि पुढच्या महिन्यांचे कर्जाचे हप्ते फेडले जाणार नसल्याने दिवाळखोरी जाहीर करण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या भारतासारख्या देशाचे पंतप्रधानपद ज्यांनी स्वीकारले आणि देशातील परमीटराज संपवून खुल्या अर्थव्यवस्थेचा धाडसाने स्वीकार केला, 28 महिन्यात भारताला उभरती आर्थिक शक्ती ठरवले त्या पामुलपती व्यंकट तथा पी. व्ही. नरसिंहराव यांचे रविवारी जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. पण, देशाच्या या भाग्यविधात्याचे स्मरण केवळ तेलंगणा या ते जन्मलेल्या राज्याने सोडले तर कोणीही केले नाही. नाही म्हणायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’मध्ये त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. गंभीर बाब म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस समितीनेही आपल्या पक्षाच्या या माजी अध्यक्षाचे उचित स्मरण केले नाही. आयुष्यातील सर्वोत्तम देऊनही अपमान, बदनामी आणि भ्रष्टाचारांच्या आरोपात गुंडाळून ज्याचा मृतदेह हैदराबादला रवाना करण्यात आला, दिल्लीत देशातील मान्यवरांच्या रांगेत ज्याला अंतिम क्षणी अग्नीही दिला गेला नाही, त्याच्या वाटय़ाला जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी आलेली ही घोर वंचना तशी काहीच नसावी. पण, या देशातील 1991 सालचा जो गरीब 1993 साली मध्यमवर्गात पोहोचला, जो मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गात पोहोचला आणि जो उच्च मध्यमवर्ग नोटांच्या ढिगाऱयात लोळू लागला त्यांनी तरी या व्यक्तीचे ऋण जाणले पाहिजेत. आपल्या मुलाने स्वकष्टाने आपले घर पुढे नेले असे ज्या ज्या आईबापाला वाटते त्या सर्वानी आपल्या मुलाला ज्यांच्यामुळे देश विदेशात मोठय़ा कंपन्यांची दारे खुली झाली आणि ज्यांच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे देशातील मुले ही नोकरी करण्यास गुणवंत ठरली त्यामागच्या खऱया भगिरथाला दुर्दैवाने सगळेच विसरले. आंध्र प्रदेशमधील या बहुभाषाकोविद आमदार आणि मंत्र्याचे गुण जाणून गरिबी हटावच्या घोषणेवर सत्तेत आलेल्या इंदिरा गांधींनी त्यांना मुख्यमंत्री केले. युएलसी कायदा लागू करायला भरीस घातले आणि जमीनदारांच्या उठावानंतर त्यांना हटवून पक्षाचा ईशान्य भारताचा प्रभारी केले. त्यांनी तेथे काँग्रेस बळकट केली ती आजतागायत. परिणामी नरसिंहराव केंद्रात मंत्री झाले. गृह, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रीपदे स्वीकारताना भारताची जगात प्रतिमा बनवली. इस्त्रायलसारखा मित्र जोडला. पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडला. राजीव गांधींना जसा भारत घडवायचा होता त्यासाठी संगणक येणारा हाच मंत्री गरजेचा होता. शिक्षण, क्रीडा, महिला, युवक कल्याण, विज्ञान तंत्रज्ञान अशी खाती मिळून नव्याने निर्माण केलेल्या मानव संसाधन विभागाचे ते मंत्री झाले आणि राजीव गांधींच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीला त्यांनी जन्म दिला. जवाहर नवोदय विद्यालय ही त्यांचीच देणगी. राजीव गांधी 1991च्या निवडणुकीला सामोरे जाताना उदारीकरणाचा विचार पक्षाच्या घोषणापत्रात घेऊन गेले होते. दक्षिण भारतात त्यांची प्रचारादरम्यान हत्या झाली आणि सोनियांनी पुढचा पंतप्रधान म्हणून नरसिंहराव यांच्या नावाला पसंती दिली. राव पंतप्रधान तर झालेच पण, अर्थमंत्री म्हणून अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांना त्यांनी जबाबदारी दिली. काँग्रेसअंतर्गत विरोधाला त्याचवर्षी तिरुपतीच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करून उत्तर दिले आणि नेहरूंनी शेती क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण का केले नाही, राजीव गांधींनी अंतिम जाहीरनामा असा का तयार केला हे मुद्दे सर्वांच्या पचनी पाडले. पण, आज ते सगळेच विरून गेले आहे. त्यांची जडण घडण जशी काँग्रेसमध्ये झाली तसाच त्यांचा संबंध रा. स्व. संघाशीही होता. आयुष्यात या दुधारी तलवारीचा त्यांना जितका लाभ झाला तितकाच तोटाही झाला. त्यांच्याभोवती संशयाचे एक वातावरण निर्माण झाले ते बाबरी मशिदीच्या पतनामुळे. मंदिर मशिद वादावर राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक सन्मान्य तोडगा निघावा म्हणून त्यांनी सहा महिने आधी खूप प्रयत्न केले. भाजप, विश्वहिंदु परिषद, मुस्लिम लीग, बाबरी मशिद समिती, माकप पासून अयोध्येतील साधुसंत, देशभरातील आध्यात्मिक गुरु, महनीय व्यक्ती, संपादक, विचारवंत यांच्या समित्यांशी महिनो न् महिने चर्चा घडवली. पण, ना भाजपला तडजोडीत रस होता ना मार्क्सवाद्यांना. देशातील सर्वच राजकीय पक्षांना त्याचे भांडवल हवे होते. परिणामी भाजप-विहिंपने अचानक करसेवेची खेळी खेळली आणि त्याचे पर्यवसान बाबरी पडण्यात झाले. देशात हिंदु-मुस्लिम दंग्याचे ते कारण बनले. राव यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केली असती तर मशीद पडली नसती असे मत त्यांच्या पक्षातही निर्माण झाले आणि हळूहळू ते एकटे पडले. आयुष्याची अखेर खटल्यांमध्ये आणि ते चालविण्यास वकिलांची फी देण्याइतकीही त्यांची स्थिती राहिली नाही. ज्यांच्यामुळे भारतीय उद्योगपतींना सोन्याचे दिवस आले त्यातील कुणीही राव यांना एक कवडी दिली नाही हेही दिसून आले. मृत्यूपश्चात त्यांच्यावरील सर्व किटाळ दूर झाले. पण, त्या न्यायात आणि अन्यायात फारसा फरकच उरलेला नाही! पोखरण अणुचाचणीचे अर्धे राहिलेले स्वप्न वाजपेयींना हस्तांतरीत करणारे, युनोत विरोधी पक्ष नेते वाजपेयींना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची उदारमनाने आणि चाणाक्षपणे संधी देणारे आणि जगासमोर भारताचा एक वेगळा आदर्श ठेवणारे नरसिंहराव हे कोण होते, हेही माहीत नसलेली पिढी आज त्यांच्या धोरणाची फळे चाखत आहे. झाड लावलेला मात्र काळाच्या अंधारात गडप झाला आहे.
Previous Articleशतधन्व्याचा वध
Next Article संसदेत या, 1962 पासूनची चर्चा करुया!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.