सध्याच्या काळात प्रत्येकाच्याच मनात एकप्रकारची नकारात्मकता आहे. कितीही प्रयत्न केले तरी नकारात्मक विचार मनात येत राहतात. त्यातच सततच्या टाळेबंदीमुळे आता वैताग आला आहे. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळेजण कंटाळून गेले आहेत. साधारण दीड वर्षांपासून आपण घरातच आहोत. अशा वेळी वेळ घालवण्यासाठी काहीतरी करायला हवं. घरातच का होईना पण प्रत्येक क्षण आनंदात घालवायला हवा. यासाठी काय करायला हवं? पाहू या.
- तुम्ही वेगवेगळे खेळ खेळू शकता. घरातले लहानमोठे मिळून सापशिडी, लूडो, कॅरम, पत्ते खेळू शकता. घरात अंगण असेल तर लगोरी, लपाछुपी, लंगडी, विषामृत असे खेळही खेळता येतील. यामुळे मजाही येईल आणि कंटाळा कुठच्या कुठे निघून जाईल.
- जुन्या आठवणींना कधीही उजाळा देता येतो. या आठवणी आपल्या मनाला उभारी देतात. त्यामुळे जुने दिवस आठवा. जुने फोटो बघा. एखाद्या सहलीचे फोटो बघताना त्या आठवणीत रमा. मुलांना लहानपणीच्या गंमतीजमती सांगा.
- सध्या सगळंच इस्टंट मिळत असलं तरी पूर्वीच्या काळी असं नव्हतं. मसाला पाटय़ावरवंटय़ावर वाटावा लागायचा. तसंच जुन्या काळात अनेकविध पदार्थही घरीच केले जायचे. गृहिणी निगुतीने रांधुन चविष्ट स्वयंपाक करायच्या. तुम्हीही मजा म्हणून हा अनुभव घेऊ शकता. आजी करत असलेला एखादा पदार्थ करून बघू शकता. मुलांनाही सोबत घेऊ शकता. यामुळे तुमचा वेळही जाईल आणि काहीतरी नवं केल्याचं समाधानही मिळेल.
- आज सोशल मीडियामुळे जुने मित्रमैत्रिणी भेटत आाहेत. व्हॉट्स ऍपवर तुमचे बरेच ग्रुप असतील. कधीतरी अगदी जिवलग मैत्रिणींसोबत ऑनलाईन गप्पांचा कार्यक्रम ठरवा. त्यात विविधता आणण्यासाठी काही खेळ खेळा. एखादी थीम ठरवा. गाण्याच्या भेंडय़ा खेळा. जुन्या आठवणीत रमा.