नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात बाराहून अधिक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेत खासदारांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी सरकारवर केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेत शेवटच्या दिवशी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता, असे वाटत होते की आपण पाकिस्तानच्या सीमेवर उभे आहोत. सरकार दररोज लोकशाहीची हत्या करत आहे. आम्ही या सरकार विरोधात लढा देत राहू, असं राऊत म्हणाले.
यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यावेळी म्हणाले की, संसदेत खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले गेले. तरीही, ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे. काल देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला गेला. त्यांना अपमानित करण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला केला गेला.
बुधवारी विधेयकाला मंजुरी देण्याच्या दरम्यान, राज्यसभेत विरोधी पक्षाचे खासदार आणि मार्शल यांच्यात हाणामारी झाली. काँग्रेसच्या राज्यसभेच्या काही महिला खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये विरोध करत असताना त्यांना मार्शलनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.