रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम हाती, पूर्वसूचना न देता बंद केल्याने नागरिकांतून नाराजी : आगामी आठ दिवस रेल्वेफाटकावरील वाहतूक बंद राहणार : केएसआरपी रोड अथवा बाचोळीमार्गे पर्यायी रस्त्याचा पर्याय
वार्ताहर /खानापूर
खानापूर-असोगा मार्गावरील रेल्वे गेटनजीक रेल्वे विभागाकडून रस्ता काँक्रीटीकरण आणि पेव्हर्स घालण्याचे काम हाती घेण्यात आल्याने रेल्वे फाटक दि. 22 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक देखील तात्पुरती बंद करण्यात आली आहे. रस्ता काम पूर्ण होईपर्यंत असोगावासियांना बाचोळी आणि केएसआरपी दुर्गानगर मंदिर रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा लागणार आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वाहतूक बंद करण्याचा रेल्वे विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
रेल्वे विभागाकडून लोहमार्ग विस्तारीकरण आणि सेवा रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक रेल्वे फाटक बंद करण्यात आले. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या पलीकडे असणारे नागरिक आणि असोगा ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी धाव घेऊन रेल्वेच्या अधिकाऱयांना धारेवर धरले. आजचा एक दिवस वाहतूक सुरू ठेवण्यास सांगून रविवारपासून नागरिकांना माहिती देऊन वाहतूक बंदीचा निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. रेल्वे स्थानकावरील भुयारी मार्गाचे काम त्वरित सुरू करून मे महिन्याच्या आत हे काम मार्गी लावावे, अशी सूचना राजेंद्र रायका यांनी केली. रेल्वे फटकाजवळील रस्ता काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून असोगा ग्रामस्थांनी बाचोळी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी विजय होळणकर, दीपक मणेरीकर, कल्लाप्पा पाटील, राजेंद्र रायका महादेव पाटील, फिलिप रॉड्रीग्स्, महेश कदम, लक्ष्मण पाटील, कृष्णा पाटील, सुरेश सुळकर व अन्य उपस्थित होते.