शेअर बाजार जेव्हा उच्चांकी पातळीवर असतो तेव्हा त्यातील दोलायमानता, अस्थिरता आणि जोखीमही तितकीच उच्च पातळीची असते. याचा प्रत्यंतर गेले काही आठवडे येत आहे. कर्जरोख्यांवरील वाढते व्याजदर यांसारख्या जागतिक स्तरावरील नकारात्मक घडामोडींचे परिणाम आगामी काळातही जाणवू शकतात. दुसरीकडे सरकारचा निर्गुंतवणुकीचा धडाका, वाढलेले जीएसटी संकलन, लसीकरण, बँक क्रेडिट ग्रोथ रेटमध्ये झालेली वाढ या जमेच्या बाजू राहतील. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. रिअल्टी, आयटी, बँकिंग, टेक्स्टाईल, इन्शुरन्स, ऑटो आणि कमोडिटी समभागात तेजी अपेक्षित आहे.
जगभरातील विशेषतः अमेरिकेतील कर्जरोख्यांच्या व्याजदरात होत असलेल्या वाढीमुळे निर्माण झालेले भयसावट गतसप्ताहात बाजाराला काळवंडून गेले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 440.76 अंकांनी घसरुन 50405.32 अंकांवर बंद झाला; तर निफ्टी 142.06 अंकांनी घसरुन 14938.10 वर बंद झाला. बँक निफ्टीमध्ये 574.35 अंकांची घसरण झाली. गेले काही दिवस स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या समभागांनी जी उसळी घेतली होती तिला गेल्या आठवडय़ात मोठा ब्रेक लागला. निफ्टी मिडकॅप 100 530.20, तर निफ्टी स्मॉल 100 131.50 अंकांनी गडगडला. काही अभ्यासकांच्या मते, बाँड यिल्डचे भूत बाजारांवर हावी झाले आहे. प्रत्यक्षात वॉरेन बफे यांच्यासारख्या जगविख्यात अर्थतज्ञानेही बाँडस्पासून चार हात लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र शेवटी शेअर बाजार हा सेंटीमेंटवर चालत असल्याने अशा घटनांचे पडसाद उमटतच राहतात. याजोडीला कच्च्या तेलांच्या वाढत्या किमती, देशांतर्गत बाजारात महागाईने ठोकलेला तळ, आंतरराष्ट्रीय भूराजकीय घडामोडी व तणाव अशा काही घटना बाजाराच्या तेजीच्या गाडला ब्रेक लावू शकतात. सोमवारी बाजाराची सुरुवात या दिशेने महत्त्वाची ठरेल.
वास्तविक, गेल्या आठवडय़ातील घसरणीने अनेक चांगल्या कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यात लक्षणीय घट झाली आहे. बजाज ऑटो, बजाज फायनान्स, एअरटेल, सेल, बँक ऑफ बडोदा, नाल्को, इंडसइंड बँक, एलआयसी हौसिंग, विप्रो, टाटा मोटर्स, एसबीआय, अदानी ग्रीन्स, हिंडाल्को, टोरंट पॉवर, इंडिया बुल हौसिंग, टाटा केमिकल्स, बालकृष्ण इंडस्ट्रीज यांसारख्या अनेक चांगल्या कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी बाजाराचा कल वरचा दिसल्यास या कंपन्यांच्या समभागांची अचूकपणाने खरेदी करावी. मध्यंतरीच्या काळात या कंपन्यांचे समभाग उच्च पातळीवर पोहोचल्याने अनेकांना ते घेता आले नव्हते. अशा गुंतवणूकदारांसाठी खरे पाहता ही नामी संधी आहे. कारण बाजारात झालेली घसरण ही दीर्घकालीन स्वरुपाची नाही. किंबहुना, तशी ठोस कारणेही दृष्टीपथात नाहीत. उलट सरकार झपाटय़ाने निर्गुंतवणुकीच्या दिशेने पावले टाकत आहे. पीएलआय स्किम्सचाही धडाका सरकारने लावला आहे. दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेत तेजी परतली असल्याचे दर्शवणारे अनेक आकडे समोर येत आहेत. वाढलेल्या जीएसटी संकलनाबरोबरच बँक क्रेडिट ग्रोथ रेटमध्ये झालेली वाढदेखील अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे दर्शवते.
चालू आठवडय़ाचा विचार करता आज महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातून इतर क्षेत्रांबरोबर बांधकाम उद्योगासाठी काही घोषणा होतेय का यावर लक्ष ठेवून राहावे. येणार्या काळात चीनमध्ये स्टीलचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज जरी जागतिक पातळीवरील स्टीलचे भाव घटल्याची बातमी आल्याने या कंपन्यांचे समभाग घसरले असले तरी दीर्घकालीन विचार करता ते वधारणार हे निश्चित आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील खतउत्पादक कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरु करणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यावर नॅशनल फर्टिलायझर आणि राष्ट्रीय केमिकल्स यांतील हिस्सा विकण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हे समभाग कमालीचे वधारले आहेत. त्यात घसरण दिसून आल्यास खरेदीची संधी दवडू नये. भूषण पॉवर ही कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलने अधिग्रहित केली आहे. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँकेने गृहकर्जांवरील व्याजदरात घट केली आहे. केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला वेग दिला जात असून यातील एक बँक ऍक्सिस बँकेकडून खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बँकेचा समभाग येत्या काळात मोठी भरारी घेऊ शकतो. केंद्र सरकारने कारमधील एअर बॅगसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे बॉश आणि राणे मद्रास या समभागांत तेजी अपेक्षित आहे. शुक्रवारच्या घसरणीमुळे या दोन्ही कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली आहे. ही संधी दवडता कामा नये.
अल्पावधीसाठीचा विचार करता कोल इंडियाचा समभाग 165 रुपये लक्ष्य ठेवून खरेदी करावा. आयसीआयसीआय लोम्बार्डचा समभाग 1555 रुपये लक्ष्य ठेवून खरेदी करावा. मणिप्पुरम फायनान्सचा शेअर सध्या 166.90 रुपयांवर आहे. ब्रोकरेज कंपन्यांनी यासाठी 207 रुपयांचे लक्ष्य दिले आहे.
याखेरीज सार्वजनिक आणि खासगी बँकिंग क्षेत्रातील समभागात चालू आठवडय़ात तेजी दिसण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र सरकार वस्रोद्योगासाठीही पीएलआय स्किम आणणार आहे. त्याचा परिणाम अरविंद, बॉम्बे डाईंग यांसारख्या कंपन्यांच्या समभागावर सकारात्मक होताना दिसेल. त्यांची खरेदी आत्तापासूनच करणे फायद्याचे ठरेल.
असे असले तरी शेअर बाजाराच्या वर्तुळात सध्या याहून मोठय़ा करेक्शनची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. त्यानुसार निफ्टी 14000 च्या पातळीपर्यंत घसरेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तो विचारात घेता बाजारातील जोखीम आणि दोलायमानता दोन्हीही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने गुंतवणूक करावी. सध्याचा काळ हा फार मोठय़ा लाभांच्या अपेक्षेचा नाही, हे लक्षात ठेवावे. – संदीप पाटील