हेरे / प्रतिनिधी
वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच हेरे-पाटणे परिसरात असतो. आता अस्वलाचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी जेलुगडे येथील शेतकऱ्याला अस्वलाने गंभीर जखमी केले होते. दोन दिवसापूर्वी जंगमहट्टी येथील शेतकऱ्यावर हल्ला केला. आणि परिसरात दहशत पसरली. जीव धोक्मयात घालून शेताशिवारातकडे जाण्यापेक्षा जीव वाचवून घरात बसलेले बरे, अशी अवस्था परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे.
सध्या काजू बागा स्वच्छता करण्यासाठी शेतात जावे लागते. अशावेळी अचानक वन्यप्राणी हल्ला करत असतील तर जगावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हेरे-पाटणे परिसरात हत्ती, गवेरेडे, कोल्हे, माकड, मोर यांचा वावर नेहमी असतो. परिसरात मुबलक पाणी, हिरवा चारा उपलब्ध असल्याने या परिसरात वन्यप्राणी राहतात. सध्या शेतातील कामाला जोर आला असून शेताशिवारातील ऊस काजू या पिकांची राखण करण्याकरिता शेतकऱयांना शेतात जावे लागते. वनविभागाकडूनही यासंदर्भात दक्षता पाळण्याचे आदेश आले असून शेतकऱ्यांनी शेतात राखणीला जाताना खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. शेतातील पिकाचे नुकसान झाले तर ते भरून काढता येईल. पण जिवाचे नुकसान झाले तर ते भरून निघणार कसे, असा प्रश्न सध्या येथील शेतकऱ्यांमधून निर्माण होत आहे.