शंकरगौडा पाटील यांचे प्रतिपादन, मराठा संघ- संस्थांच्यावतीने सत्कार
प्रतिनिधी/ बेळगाव
काहीवेळा राजकारणापासून मी अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेच्या विश्वासामुळे मी पुन्हा राजकारणात आलो आणि यशस्वी वाटचाल चालविली आहे. मात्र काही राजकारणी मंडळी आणि लोकप्रतिनिधी मिळालेल्या पदामुळे अहंकारी बनतात. त्यांचा अहंकार मोडण्याची शक्ती जनतेमध्ये आहे. हे विसरता कामा नये, असे प्रतिपादन कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी केले.
बेळगाव शहरातील मराठा समाज संघ, संस्थांच्यावतीने शंकरगौडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी वरील विचार मांडले. संघ, संस्थांच्यावतीने शाल, पुष्पहार, भगवा फेटा बांधून शंकरगौडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. लोकांच्या विश्वासामुळे मला प्रेरणा मिळाली. मराठा समाजाशी माझे नेहमीच जिव्हाळय़ाचे संबंध राहिले आहेत. याचबरोबर कौटुंबिक संबंध देखील आहेत. राष्ट्रीयस्तरावर मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
मराठा समाजाने देशाला मोठे योगदान दिले आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी कर्नाटक राज्यात मराठा विकास महामंडळ स्थापन केले आहे. विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्नाटक राज्य आणि बेळगाव सीमाभागातील मराठा समाजाची प्रगती होणार आहे. महामंडळाच्या माध्यमातून मिळणाऱया निधीचा मराठा समाजाने चांगला उपयोग करून घ्यावा. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कोरोनाकाळात माधुरी जाधव यांनी केलेल्या कार्याचे शंकरगौडा पाटील यांनी विशेष कौतुक केले. बेळगाव जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटना, मराठा बँक, मराठा मंदिर ट्रस्ट, बेळगाव कुस्ती संघटना, मराठा जागृती मंच, बेळगाव रोलर स्केटींग असोसिएशन, मंगाई देवस्थान, वेदांत सोसायटी, बेळगाव पत्रकार संघ, उचगाव साहित्य संघ, हेल्प फॉर नीडी, बेळगाव कोल्ड्रींग असोसिएशन यांच्यासह विविध संघ, संस्थांच्या पदाधिकाऱयांनी हा सन्मान केला.
यावेळी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, ऍड. कमलकिशोर जोशी, बाळासाहेब काकतकर, गोपाळ बिर्जे, शिवाजीराव हंगिरगेकर, लक्ष्मण होनगेकर, प्रकाश येजरे, सुधीर बिर्जे यांनी विचार व्यक्त केले.