केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा अखिलेश यांच्यावर शाब्दिक हल्ला
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटांचा मुद्दा आता उत्तरप्रदेश निवडणुकीतही गाजू लागला आहे. पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका दहशतवाद्याचे कुटुंब समाजवादी पक्षाशी जोडले गेलेले असल्याचा दावा केला. तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अखिलेश यादव यांच्यावर दहशतवादाला बळ पुरविण्याचा आरोप केला आहे. अखिलेश यांनी दहशतवाद्यांना वाचविण्याचा निर्धार केला असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
दहशतवाद्यांचा मुद्दा समोर आल्यास भाजप झिरो टॉलरन्सचे धोरण बाळगून आहे. तर समाजवादी पक्ष सहकार्याची भूमिका बाळगते. अहमदाबाद येथे स्फोट घडविणाऱया दहशतवाद्याचा सप नेत्यांशी थेट संबंध आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर देखील समाजवादी पक्षाकडून कुठलेच विधान समोर आलेले नाही. अशा स्थितीत समाजवादी पक्षाकडून दहशतवाद्यांचा बचाव करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अहमदाबाद येथील स्फोटात सामील दहशतवादी मोहम्मद सैफचे वडिल हे समाजवादी पक्षाचे नेते असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी केला आहे.
समाजवादी पक्षाने आझमगढला दहशतवाद्यांचा गड केले आहे. समाजवादी पक्षाला एसटीएफ आणि पोलिसांवरही भरवसा नाही. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे सप सरकारमध्ये दहशतवाद्यांना संरक्षण मिळते. समाजवादी पक्ष देशातील असा पहिला पक्ष आहे, ज्याने 2012 च्या स्वतःच्या घोषणापत्रात सत्तेवर आल्यास दहशतवाद्यांच्या विरोधात नोंद सर्व गुन्हे मागे घेण्याचे आणि पोलिसांवर गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन दिले होते असा दावा ठाकूर यांनी केला आहे.