कांदळवन कक्षाकडून शासनाला प्रस्ताव : दहा वर्षांच्या मेहनतीला यश – डॉ. सारंग कुलकर्णी
प्रतिनिधी / मालवण:
कोकण किनारपट्टीपासून 105 किमी दूर समुद्रात असलेल्या समृद्ध आंग्रिया प्रवाळ बेटाला ‘सागरी क्षेत्र कायदा 1976’ अंतर्गत संरक्षण देण्याचा प्रस्ताव वन विभागाने राज्य सरकारला पाठविला आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाचे अवलोकन करून त्याला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव ‘केंद्रीय पर्यावरण मंत्रालया’ला पाठविण्यात येईल. वन विभागाच्या ‘कांदळवन कक्षा’ने (मँग्रोव्ह सेल) आंग्रिया बेटावरील समृद्ध सागरी जैवविविधता संरक्षित करण्यासाठी या बेटाला संरक्षण देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्राची सीमा 12 सागरी मैल अंतरापर्यंत आहे. 12 ते 200 सागरी मैलापर्यंतचे क्षेत्र केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. त्याला ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ (exclus economic zone) म्हटले जाते. हे संपूर्ण क्षेत्र ‘केंद्रीय विदेश मंत्रालया’च्या अधिकारांतर्गत येते. सागरी जैवविविधता संवर्धनाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात केवळ दोन क्षेत्रांना संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. यात ‘मालवण सागरी अभयारण्य’ आणि ‘ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या’चा समावेश होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील आरमाराचे प्रमुख कोन्होजी आंग्रे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले आंग्रिया प्रवाळ बेट कोकण किनारपट्टीपासून 56.7 सागरी मैल दूर आहे. या बेटाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याठिकाणी जाता येत नाही. मात्र, या बेटावरील सागरी जैवविविधता लक्षात घेता, तिच्या संवर्धनाचे प्रयत्न होणे आवश्यक आहेत. यासाठी वन विभागाच्या ‘कांदळवन कक्षा’ने या बेटाला ‘सागरी क्षेत्र कायद्यां’तर्गत ‘विशेष आर्थिक क्षेत्रा’मध्ये संरक्षित करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
जैवविविधता सर्वेक्षणाच्या आधारे प्रस्ताव तयार
आंग्रिया प्रवाळ बेट हे 12 सागरी मैलाच्या पुढे येत असल्याने ते ‘विदेश मंत्रालया’च्या अधिकारांतर्गत येते. त्यामुळे अशा परिस्थितीत या क्षेत्राला ‘वन्यजीव संरक्षण कायद्यां’तर्गत संरक्षित करता येत नसल्याची माहिती ‘कांदळवन कक्षा’तर्फे देण्यात आली. सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या या बेटाला केवळ ‘विदेश मंत्रालया’च्या ‘सागरी क्षेत्र कायद्यां’तर्गत कायदेशीर संरक्षण देता येईल. म्हणूनच त्यासंदर्भातील प्रस्ताव वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाला पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. 2019 च्या अखेरीस ‘मँग्रोव्ह फाऊंडेशन’ आणि ‘वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया’च्या (डब्ल्यूसीएस) टीमने या बेटावर जाऊन केलेल्या जैवविविधता सर्वेक्षणाच्या आधारे हा प्रस्ताव तयार केला आहे.
प्रस्ताव विदेश मंत्रालयाला पाठविला जाणार
याविषयी राज्याच्या वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ‘कांदळवन कक्षा’कडून आंग्रिया बेटाच्या संरक्षणाबाबत प्राप्त झालेला प्रस्ताव गेल्याच आठवडय़ात आम्ही राज्य शासनाला पाठविला आहे. राज्य शासनाने या प्रस्तावाचे अवलोकन करून त्याला मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव ‘केंद्रीय पर्यावरण मंत्रालय’ आणि त्यांच्याकडून ‘विदेश मंत्रालया’ला पाठविला जाईल. प्रवाळांच्या समृद्ध जैवविविधतेसाठी आंग्रिया बेट प्रसिद्ध असून कोणतेही संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने ही जागा उत्कृष्ट झाल्याचे मत अनेक ज्येष्ठ सागरी जीवशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. या जागेला संरक्षित करण्यासाठी मँग्रोव्ह सेल आणि फाऊंडेशनने आवश्यक ते प्रयत्न केले आहेत.
आंग्रिया बेटाविषयी….
कोकण किनारपट्टीपासून 105 किमी अंतरावर आंग्रिया प्रवाळ बेट आहे. हे बेट समुद्रात साधारण 2,011 किमी क्षेत्रात पसरलेले आहे. त्याची खोली 20 ते 400 मीटरपर्यंत आहे. 650 किमी क्षेत्रात केवळ प्रवाळ खडक असून इतर सागरी जीवांची जैवविविधता आहे. ‘भारतीय वन्यजीव संस्थे’ (डब्ल्यूआयआय) ने आंग्रिया बेटाचा समावेश भारतातील 106 ‘महत्वपूर्ण किनारी आणि सागरी जैवविविधता क्षेत्रां’च्या (आयसीएमबीए) यादीत केला आहे.
आंग्रिया बेटावरील सर्वेक्षणे…
‘बीएनएचएस’चे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी 1990 साली या बेटाला भेट दिली होती. नंतर या बेटाचे प्रथम सर्वेक्षण आणि छायाचित्रण 2008-09 च्या सुमारास डॉ. सारंग कुलकर्णी यांनी केले होते. 2014 साली ‘यूएनडीपी’ प्रकल्पांतर्गत ‘कांदळवन कक्ष’ आणि ‘राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थे’ने (एनआयओ) या बेटाचे सर्वेक्षण केले. आता 2019 च्या अखेरीस ‘मँग्रोव्ह फाऊंडेशन’ आणि ‘डब्ल्यूसीएस’ने आंग्रिया बेटाच्या सागरी जैवविविधतेचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात त्यांना प्रवाळांच्या 150 हून अधिक प्रजाती, माशांच्या 120 प्रजाती, इनव्हर्टीब्रेटच्या 40 हून अधिक प्रजाती आढळून आल्या.
दहा वर्षांची तपश्चर्या फळाला आली!
अखेर दहा वर्षांची तपश्चर्या फळाला आली, अशा शब्दांत मालवणचे सागरी संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंग्रिया बेटाच्या संवर्धनासाठी डॉ. कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.