बेंगळूर/प्रतिनिधी
अनलॉकनंतर मध्य रेल्वे आणि दक्षिण-पश्चिमरेल्वेच्यावतीने एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर नकारात्मक चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.
दरम्यान, याआधी शेजारील राज्यांमध्ये डेल्टा प्लस प्रकारांबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना नकारात्मक आरटी-पीसीआर प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. तसेच कोरोना चाचणी अहवाल ७२ तासांपेक्षा जुना नसावा. तसेच विमानाद्वारे किंवा बस, ट्रेन किंवा रस्ता मार्गे राज्यात येणार्या प्रवाश्यांसाठी कोविड -१९ लसीचा किमान प्रथम डोस घेतल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक केले आहे.
गुरुवारी राज्य सरकारने म्हटले आहे की, केरळमधून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना लसीचा किमान एक डोस घेतलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर प्रमाणपत्र असेल तर प्रवाशांना नकारात्मक आरटी-पीसीआर अहवाल देण्यात सूट असेल असे म्हंटले आहे. परंतु अनलॉक ३.० नंतर राज्यात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि नैऋत्य रेल्वेच्यावतीने एक्स्प्रेस गाड्या सुरु केल्या जाणार आहेत. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन आंतरराज्य रेल्वे प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना प्रवासावेळी सोबत कोरोना नकारात्मक अहवाल असणे बंधनकारक केले आहे.