कोविड-19 नियमांचे पालन करावे लागणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी झाल्यानंतर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा आज म्हणजेच 27 मार्च 2022 पासून सुरू होत आहे. मात्र, प्रवाशांना कोविडचे नियम पाळावे लागतील. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती. सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे केवळ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परदेशी उड्डाणांसाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच चालतील, असे केंद्र सरकारने सांगितले.
जुलै 2020 पासून, एअर बबल व्यवस्थेअंतर्गत भारत आणि 37 देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवली जात होती. मात्र, आता नवीन आदेशानुसार एअर बबल सिस्टम देखील संपुष्टात येईल, असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी स्पष्ट केले. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील काही तरतुदी रद्द केल्या आहेत. देशातील बहुतांश कोरोना निर्बंध 31 मार्चपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, कोविड प्रतिबंधात्मक उपायांवरील प्रयत्न सुरुच राहणार असून नियमित मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोना संसर्गामुळे केंद्र सरकारने 24 मार्च 2020 रोजी देशात निर्बंध लागू केले होते.
यशस्वी लसीकरण मोहिमेनंतर देशात कोरोना संसर्गात घट झाली आहे. साहजिकच लवकरच कोरोना महामारीमुळे लादलेले निर्बंध हटवले जात आहेत. यापूर्वीचे बहुतांश निर्बंध 31 मार्च 2022 रोजी संपतील, तरीही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक असेल. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी देशातील जनता निर्बंधमुक्त जीवन जगणार आहे.