नवी दिल्ली /प्रतिनिधी
देशात पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर पुन्हा एकदा ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. विमान नियामक नागरी उड्डाण संचलनालयानं याबद्दलची माहिती प्रसारित केली आहे. याआधी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रसारामुळे मागील वर्षी २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद आहे.
नागरी उड्डाण संचलनालयाच्या मते, भारतातून जाणारी आणि भारतात येणारी आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ मार्च २०२१ ला २३ वाजून ५९ मिनीटांपर्यंत निलंबित करण्यात आली आहेत. मात्र, काही निवडक मार्गांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते. हे नियम मालवाहतूक उड्डाणं आणि डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या उड्डाणांना लागू नसतील.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २७ जानेवारीला मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना आणि एसओपी ३१ मार्चपर्यंत लागू राहतील, असा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी दिला. यासोबतच डीजीसीएनेही पत्रक जारी करत आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे.एकूण २४ देशांसोबत भारताने ‘एअर बबल’ करार केला आहे. ‘एअर बबल करारा’नुसार संबंधित दोन्ही देशांमध्ये विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं करता येऊ शकतात. ‘एअर बबल’द्वारे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.