मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचे आवाहन
नवे शैक्षणिक धोरण त्यादृष्टीने लाभदायक
तरुण भारत वर्धापन दिनी सावंतवाडीत संवाद कार्यक्रम
शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयावर विचारमंथन
प्रतिनिधी / सावंतवाडी :
कोरोना काळात गावांचे महत्व वाढले, हे मानावेच लागेल. या काळात काहींच्या नोकऱया गेल्या. त्यामुळे गावपातळीवर पारंपरिक उत्पन्नाच्या स्रोतांकडे लोक वळले. आता गावपातळीवर कौशल्याधारित कार्यक्रम पुन्हा रिकव्हर होतोय, असे वाटते. तसेच आयुर्वेदिक उपाय, पारंपरिक ज्ञान हे व्हॅलिड होत नाही, तोपर्यंत वापरायचेच नाही का, याचाही विचार झाला पाहिजे. आंतरिक क्षमतेला प्राधान्य देऊन शिकता आले पाहिजे. त्यादृष्टीने नवे शैक्षणिक धोरण लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी येथे केले.
‘तरुण भारत’ सिंधुदुर्ग आवृत्तीच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त रामेश्वर प्लाझा येथील शंकरराव गवाणकर महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ. देशमुख यांच्याशी गप्पाटप्पा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ‘तरुण भारत’चे जिल्हा आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांच्यासह जिल्हय़ातील प्रतिनिधींनी डॉ. देशमुख यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. ‘कोरोना’ काळ, त्यानंतर झालेले परिणाम, नवीन शैक्षणिक धोरण, आगामी काळातील आव्हाने अशा अनेकविध विषयांवर डॉ. देशमुख यांनी मते मांडली.
ते म्हणाले, शिक्षणाच्या बाबतीत पूर्वी गुरुकुल पद्धती होती. त्यानंतर 1940 च्या दशकात इंग्रजांनी आजची शिक्षण पद्धती आणली. शिक्षण व्यवस्था मोल्ड केली गेली आणि आपण त्या व्यवस्थेला बांधलो गेलो. आजच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये याचा उल्लेख आहे. आज देशात 14 वर्षांखालील मुलांची संख्या 16 कोटी आहे. त्यापैकी शाळेत किती जातात? कोरोना नसतानाही किती जायचे? शाळेत न जाताही परीक्षा देण्याची सोय नव्या धोरणात आहे. पाचवी, आठवी, दहावी, बारावीच्या परीक्षा शाळेत न जाताही देता येतील. जसे शक्य आहे, तसे शिका. यात स्किल डेव्हलपचा चॉईस मुलांना देऊ शकतो. तसेच एक वर्ष कोर्स केल्यानंतर शिक्षण थांबले तर काही वर्षांनी पुन्हा कोर्स करताना किंवा दुसऱया ट्रेडला प्रवेश घेतला तर ते क्रेडिट धरले गेले पाहिजे, असे नवे धोरण सांगते.
वर्षभरात नक्कीच मात करू!
‘कोरोना’ महामारीवर भारतासोबतच अन्य देशही लस शोधत आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आहे. स्पॅनिश फ्ल्यू ही समस्या 100 वर्षांपूर्वी उद्भवली होती. आज 116 वर्षानंतरही त्यावर विजय मिळवेल, अशी लस नाही. याचा अर्थ कोरोनावर लस येणार नाही, असे नाही. जागतिक आरोग्य संघटनेला जूनपर्यंत 100 टक्के लस येईल, असे वाटते. भारतातील तीन कंपन्यांनी 3 ते 4 महिन्यात लस येईल, असा केलेला दावा खरा आहे. आज वैद्यकशास्त्र प्रगत असल्याने मृत्यूच्या दारापर्यंत जावे लागू नये, एवढी लस वर्षभरात निश्चित येईल, असा विश्वास डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.
एकत्रित प्रयत्न स्तुत्यच!
लॉकडाऊनबाबत शासनाने उचललेल्या पावलांचे रिझल्ट आपल्याला दिसत आहेत. कारण जागतिक लोकसंख्येच्या एक षष्टांश एवढी लोकसंख्या आपल्या देशाची आहे. अतिप्रगत व प्रगत देशांचा कोरोना महामारीबाबत आपल्या देशाशी तुलनात्मक विचार केला तर अशा कठीण स्थितीला सामोरे जावे लागल्याचे प्रमाण कमी आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे एकत्रित येत जे सार्वत्रिक प्रयत्न झाले ते स्तुत्यच असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.