दिगंबर कामत यांची सरकारवर टीका
प्रतिनिधी/ पणजी
शेळ मेळावली येथे आयआयटी प्रकरल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात बुधवारी पोलिसांनी आंदोलकांसोबत केलेले कृत्य निंदनीय असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले. आंदोलन हाताळण्यासाठी लोकांशी संवाद साधून त्यांचे मनपरिवर्तन करणे गरजेचे आहे. आंदोलकांना मारहाण करणे म्हणजे आंदोलन हाताळणे नव्हे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असेही कामत यांनी सांगितले.
मेळावली येथे अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना त्वरित सोडवा, ज्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत ते मागे घ्यावे तसेच आंदोलकांसोबत जे हिन कृत्य करण्यात आले त्याला जबाबदार असणाऱयाविरोधात कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस कार्यकत्यांनी पोलीस महानिरीक्षक राजेशकुमार सिंग यांना दिले आहे. उपलब्ध असलेले व्हिडिओ फुटेज पाहून आपण सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन पोलीस महानिरीक्षकांनी दिले असल्याचे कामत यांनी सांगितले.
काँग्रेसचा पोलीस मुख्यलायावर मोर्चा
सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांविरोधात केलेल्या हिन कृत्याचा निषेध म्हणून काँग्रस कार्यकर्त्यांनी गुरुवारी पोलीस मुख्यलायावर मोर्चा आणला होता. त्यांना मुख्यलायाच्या बाहेर अडविले असता काँग्रेस कार्यकत्यांनी पोलीस महासंचालकांना भेटण्याची मागणी केली. पोलीस महासंचालक कार्यालयात उपलब्ध नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आठ लोकांच्या एका शिष्ठमंडळाला पोलीस महानिरीक्षकांना भेटण्याची अनुमती देण्यात आली. पालीस महानिरीक्षकांना निवेदन दिल्यानंतर दिगंबर कामत पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे गिरीष चोडणकर, प्रतिमा कुतिन्हो, संकल्प आमोणकर, वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, स्वाती केरकर, विजय भिके, तसेच इतर काही कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण कधीही पोलिसांना जनतेच्या अंगावर सोडले नाही
दिंगबर कामात पुढे बोलताना म्हणाले की आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आपणे अनेक आंदोलने हाताळली आहेत. पण कधीही पोलिसांना आंदोलकांच्या अंगावर सोडून त्यांना अमानुष मारहाण करायला दिले नाही. विरेध करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. आंदोलकांशी संवाद साधून त्यांचेही म्हणणे ऐकून घेणे आवश्यक असते. थेट पोलिसांना कारवाई करायला लावल्यास आंदोलन अधिक चिघळते आणि त्याचे परिणाम वाईटच होत असतात. विद्यमान सरकार तेच करीत असून कालांतराने हे आंदोलन चिघळणार आणि त्याला जबाबदार सरकारच असेल असेही दिगंबर कामत म्हणाले.
वाळपई पोलीस स्थानकात काम करणारे पोलीस व त्या भागातील लोक यांचा चांगला संबंध असून सरकार तो बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलीस खात्यात काम करणारे प्रत्येक पोलीस हा वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात येऊन गेलेला असतो त्यामुळे त्याचा वाळपई लोकांशी संबंध येतच असतो. या आंदोलनामुळे वाळपइ परिसरातील लोक व पोलिसांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. आंदोलानाच्या ठिकाणी अधिकाधिक पोलीस तैनात केल्याने आंदोलन आटोक्यात येत नसून ते अधिक चिघळते. वाळपई परीसरात संपूर्ण गोव्यातील पोलीस तैनात करण्यात आले असल्याने त्याठिकाणी एक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील लोक भयाभित झाले असल्याने ते कोणत्याही थराला जाण्याची शक्यता नाकारत येत नाही तसे काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार असतील असेही कामत म्हणाले.
यावेळी गिरीष चोडणकर म्हणाले की आंदोलकांना पोलिसांचा धाक दाखवून सरकार सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. गोव्याचे लोक शांत आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर अन्याय झाल्यावर ते गप्प बसतील. गोव्याचे लोक पेटून ऊठल्यास भाजपाला त्यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही. आंदोलकांवर कारवाई करताना केवळ काँग्रेस कार्यकत्यांना निवडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांच्या वारेधात गुन्हे नोंद करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरकारला ते शक्य होणार नाही असेही चोडणकर म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सर्वसामान्य लोकांचे पडलेले नसून ते केवळ किती पैसे मिळतील याचा हिशोब करीत आहेत अशी टीकाही चोडणकर यांनी केली आहे. यावेळी इतर कार्यकर्त्यांनीही समयाजित विचार मांडताना सरकारवर खरपूस टीका केली.