केवळ 3080 रुपये जमा केल्याने कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर : कामगार वर्गातून तीव्र नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या कित्येक वर्षांपासून हंगामी तत्त्वावर काम करणाऱया कामगारांना सेवेत कायम करा, या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले होते. दहा दिवसांनंतर केवळ वॉल्व्हमन व अन्य कामगारांना कामावर घेण्यात आले. मात्र कामावर घेतलेल्या कामगारांच्या पगारात कपात करण्यात आले असून केवळ 3 ते 5 हजार रुपये खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा मंडळाकडे 350 हून अधिक कामगार हंगामी तत्त्वावर काम करीत होते. 24 तास पाणी योजना राबविण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाकडील कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे हस्तांतर करण्यात आला आहे. कामगारांना सेवेत कायम करावे व वेळेत वेतन द्यावे, या मागणीसाठी कामबंद आंदोलन छेडले होते. वेळेवर वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामावर घेण्यात आले. तसेच कामगारांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर कामगारांनी कामकाज सुरू केले होते.
मात्र तीन महिन्यांनंतरही याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱया 359 कामगारांनी कामबंद करून धरणे आंदोलन छेडले. सर्व कामगारांना सेवेत कायम करावे, अशा मागणीचे निवेदन महापालिकेला व जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले.
आश्वासनाखेरीज कोणतीच कार्यवाही होत नसल्याने पाणीपुरवठा कामगारांनी कामावर दांडी मारली. परिणामी शहरातील पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे कोलमडले होते. नवीन कामगार घेऊन कामकाज सुरू करण्याची तयारी करण्यात येत असताना दहा दिवसांनंतर पाणीपुरवठय़ाच्या कामगारांनी आंदोलन मागे घेतले. मात्र कामावर घेण्यास जिल्हाधिकाऱयांनी प्रतीक्षा करण्याची सूचना केली. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर केवळ व्हॉल्व्हमन आणि दुरुस्ती कामगारांना कामावर घेण्यात आले. बिल कलेक्टर व कार्यालयात काम करणाऱया कामगारांना घेण्यात आले नाही. मात्र दहा दिवसांनंतर कामावर हजर झालेल्या वॉल्व्हमन आणि दुरुस्ती कामगारांच्या पगारात मोठय़ा प्रमाणात कपात करण्यात आली आहे. कामावर गैरहजर राहिल्याचे कारण देऊन सर्व कामगारांच्या वेतनात कपात करून केवळ 3 हजार 80 रुपये खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर पोलीस संरक्षणात पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्र, राकसकोप, बसवणकोळ्ळ, हिडकल डॅम अशा ठिकाणी काम केलेल्या 107 कामगारांचे वेतन पूर्णपणे जमा करण्यात आले आहे.
केवळ 10 दिवस गैरहजर राहिले असताना 300 कामगारांचे वेतन कपात करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 10 दिवसांचे वेतन कपात करण्यात आल्याबद्दल कोणतीच हरकत नाही. मात्र दुप्पट रक्कम कपात करण्यात आल्याने 3 हजार रुपयांमध्ये उदरनिर्वाह कसा करायचा, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मिळणारा पगार अल्प असून त्यातही कपात करण्यात आल्याने मोठी अडचण झाली आहे.
या तुटपुंज्या पगारात घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे दहा दिवसांचे वेतन कपात करून उर्वरित 20 दिवसांचा पगार देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.