वार्ताहर / उचगाव
हातकणंगले, शिरोळ येथील पूरग्रस्त महिलांची कर्जमाफी व फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवावी, या मागण्यासाठी उचगांव पैकी निगडेवाडी (ता. करवीर) येथील पंचगंगा नदी घाटावर जलआंदोलनास बसलेल्या दोन महिला आंदोलकांनी शुक्रवारी पंचगंगा नदीत उडय़ा टाकून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. खासदार धैर्यशील माने त्यांच्यासमोरच अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत उडी घेतलेल्या महिलांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली. शनिवारी महसूलमंत्र्यांसमवेत पूरग्रस्तांची कर्जमाफी, फायनान्स कंपन्यांची कर्जे व वसुलीबाबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महसूलमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयानंतरच आंदोलन मागे घेण्यात येईल, असे छत्रपती प्रशासन महिला आघाडीच्या आंदोलक नेत्या दिव्या मगदूम यांनी स्पष्ट केले.
हातकणंगले, शिरोळ येथील पूरग्रस्त महिलांची कर्जमाफी व्हावी व फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवावी या मागणीसाठी निगडेवाडी (ता. करवीर) येथील नदीघाटावर उपोषणासह जलआंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढण्यासाठी धैर्यशील माने आणि माजी खासदार निवेदिता माने शुक्रवारी साडेअकराच्या दरम्यान त्याठिकाणी आले. खासदार माने यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी फोनवरून बोलणे झाले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांना तीन आठवड्यांसाठी वसुली बंद करण्याचा आदेश देतो असे सांगितले. माने यांनी तीन आठवड्याच्या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ घेवून बैठक बोलावूया असे आंदोलक महिलांना सांगितले. गेल्या तीन महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहेत. जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरही मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या लोकांनी त्रास दिला आहे. पूरग्रस्त महिलांच्या प्रश्नी प्रशासनाची मोठी उदासिनता आहे असे सांगून महिलांनी माने यांचे म्हणणे मान्य केले नाही.
नदीकाठावर एकच गोंधळ
खासदार माने यांची चर्चा सुरू असतानाच दोन महिलांनी पंचगंगा नदीच्या पात्रात उड्या घेतल्या. यावेळी एकच गोंधळ उडाला, अग्निशमन दलाचे जवान अभय कोळी, मेहबूब जमादार, सुनील यादव, नवनाथ साबळे जवानांनी महिलांना बाहेर काढले. महिलांना पाठिंबा देण्यासाठी पाचशेवर महिला नदीच्या काठावर बसल्या होत्या. महिलांनी उडय़ा मारल्या त्यावेळी काठावर आणि मंडपात मोठा गोधळ उडाला.
आंदोलक महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकल्यानंतर माने थेट जिल्हाधिकाऱयांकडे गेले. त्यांनी आंदोलक महिलांची कैफियत मांडली. जिल्हाधिकारी देसाई यांनी याबाबत तातडीने अहवाल तयार केला व तो माने यांच्याकडे दिला. माने पुन्हा सायंकाळी आंदोलनस्थळी आले.
सकारात्मक तोडगा निघेल ः खासदार धैर्यशील माने
फायनान्स कंपन्यांनी सक्तीची वसुली करु नये, असे जिल्हाधिकाऱयांच्या अहवालात नमूद होते. त्यातील सक्तीची या शब्दप्रयोगाला आंदोलक महिलांनी आक्षेप घेतला. त्यानंतर माने यांनी आंदोलकंसमोर स्पष्ट केले, की एक
लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासह जिह्यातील तीन मंत्री तुमच्यासोबत आहेत. महसूल मंत्र्यांबरोबर होणाऱया चर्चेत तुमचे प्रतिनिधीही सहभागी होतील. आम्ही महसूलमंत्र्यांसमोर तुमची बाजू मांडू. त्यातून सकारात्मक तोडगा निघेलच. फायनान्स कंपन्यांची बैठकही घेऊ. जोपर्यंत याप्रश्नी शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत वसुली करू नका असे शासनातर्फे सूचना करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मंत्री यड्रावकर यांचा ताफा अडविला
दुपारी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आंदोलनस्थळी आले. त्यांनी याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे सांगितले. त्यावर महिला आंदोलकांचे समाधान न झाल्याने त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. महिला आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने ताफा मार्गस्थ झाला.