प्रतिनिधी / नागठाणे :
महावितरण कंपनीकडून कोणतीही लेखी पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागठाणे (ता.सातारा) येथून गणेशवाडी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात सामील झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह 74 शेतकरी आंदोलकांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.महावितरणचे गणेशवाडीचे सहायक अभियंता अजित आधिकराव ढगाले यांनी याबाबत मंगळवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली.
याबाबत बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके हे सुमारे शंभर लोकांचा मोर्चा घेऊन गणेशवाडी महावितरण कार्यालय येथे येऊन गेटवर ठिय्या मारून बसले.त्यामुळे कार्यालयात येण्या-जाण्यास अडथळा निर्माण झाला.त्यांनी शेतीपंप थकबाकीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा जोडण्याची मागणी केली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करून दहा टक्के वीजबिल भरल्यावर कनेक्शन जोडू तसेच वरिष्ठ कार्यालयाचा निर्णय होईपर्यंत आंदोलन स्थगित करा असे सांगितले.मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले.त्यामुळे आंदोलकांनी जिल्हाधिकायांच्या आदेशाचे उल्लंघन करून विनामास्क,सुरक्षित अंतर न ठेवता स्वतः व इतरांच्या जीवितास धोका होईल व संसर्गजन्य रोगाचा प्रसार होईल हे माहीत असूनही बेजबाबदारपणे आंदोलन केले.
बोरगाव पोलिसांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र (राजू) सर्जेराव शेळके(जावळापूर),मधुकर रामचंद्र खुळे (नागठाणे), दीपक शंकर नलवडे(नागठाणे), नितीन हणमंत घाडगे(बोरगाव),राजू शंकर केंजळे (अतीत) यांच्यासह सुमारे 74 शेतकरी आंदोलकांवर भारतीय दंड संहिता 1860 कलम 188,369,341,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51(ब),महाराष्ट्र कोविड-19 विनियमन 2020 कलम 11 व साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 3 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास हवालदार राजू शिखरे करत आहेत.