आंदोलनच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासून कारवाई
प्रतिनिधी/ कोल्हापूर
मशीनतोड उसाच्या वजावटीवर तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनांनी आज पासून तोडी बंद पाडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश, जयशिवराय, बळीराजा शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची पहाटेपासूनच पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. आंदोलन अकुंशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांना पहाटे शिरोळ येथील रहात्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासोबत राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, अक्षय पाटील, कृष्णात देशमुख, उदय होगले, दत्ता जगदाळे, सागर पुजारी, दीपक पाटील, शाहीर बाणदार आदींना शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड या पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.
मशीने तोडलेल्या उसाची टनाला पाच टक्के कपात सुरु आहे, याविरोधत धनाजी चुडमुंगे, शिवाजीराव माने, बी. जी. काका पाटील यांनी तक्रार केली होती. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कपात करु नये असे आदेश दिले होते. मात्र चार कारखाने वगळता अन्य कारखान्यांनी कपात सुरुच ठेवली आहे. या विरोधत हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्य़ांनी पोलीस ठाण्यातच उपोषण सुरु केले आहे.