प्रतिनिधी/दिल्ली
तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर जवळपास 378 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. शेतकऱ्यांनी शनिवारी आंदोलनस्थळी ‘विजय दिवस’ साजरा करत जल्लोष केला. त्यानंतर आंदोलक शेतकरी माघारी निघाले. दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी १५ डिसेंबरपर्यंत गाझीपूर सीमा रिकामी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार थोड्या प्रमाणात राहिलेले शेतकरी देखील घराच्या वाटेने निघाले आहेत. तर, दुसरीकडे सिंघू सीमेवरूनही शेतकऱ्यांची घरवापसी सुरू आहे. आज दिल्लीच्या सीमा खाली करून निघताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले. तसेच आंदोलन संपलं नसून केवळ स्थगित केलं असल्याची माहितीही यावेळी टिकैत यांनी दिली.
दरम्यान आज दिल्लीच्या सीमा खाली करून निघताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी “आमच्यासोबत असलेल्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. लंगर चालवणार्या लोकांचे, आमच्यासाठी जीवनावश्यक वस्तू आणणार्या ग्रामस्थांचेही मी आभार मानतो. शेतीविषयक तिन्ही कायदे मागे घेतल्यानंतर केंद्राशी चर्चा सुरू आहे. आम्ही आमचे आंदोलन स्थगित केले आहे, मागे घेतलेले नाही,” असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले.