ऑनलाईन टीम / अमरावती :
आंध्रप्रदेशातील जगनमोहन रेड्डी सरकारने विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने विरोधकांना मोठा धक्काच बसला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत विधान परिषद बरखास्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी दिली.
कॅबिनेटच्या बैठकीनंतर आंध्र प्रदेश सरकारच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या बैठकीत विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषदेत 58 सदस्य आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या हातात राज्याची सत्ता असली तरी विधान परिषदेत चंद्रबाबू नायडू यांचे बहुमत आहे. या सभागृहात टीडीपीचे 27 तर वायएसआरचे 9 सदस्य आहेत. कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरु होईल.
रविवारी नायडू यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी पक्षाचे 21 आमदार विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय झाला.