तिरुपती / वृत्तसंस्था
आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे शनिवारी रात्री झालेल्या एका भीषण बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात तिरुपतीपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बाकरपेटा येथे झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस खडकावरून दरीत कोसळल्याचे ही दुर्घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. बस खोल दरीत कोसळल्यामुळे रविवारी पहाटे पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकाने सात मृत आणि 45 जखमी लोकांना बाहेर काढले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसमधील प्रवासी लग्न समारंभासाठी जात असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती तिरुपती विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.
तिरुपतीपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या चंद्रगिरी मंडलमधील बाकरपेटा भागात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत बचावकार्यात सुरु केले. काही वेळाने पोलीस आणि प्रशासनाच्या पथकासह बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री अंधार असल्याने बचावकार्यात अडचण निर्माण झाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना दुसऱया रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.