ऑनलाईन टीम / हैदराबाद :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आंध्र प्रदेश सरकारने राज्यात सुरू असलेला कोरोना कर्फ्यू 20 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. असे असेल तरी कर्फ्यूचा वेळ दोन तासांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आता सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत सूट देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वाय. एस. जगन रेड्डी यांनी सोमवारी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रदेशात 5 मे ते 31 मे पर्यंत कर्फ्यू जारी करण्यात आला होता. प्रदेशात रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे, पण रुग्ण संख्या पुन्हा वाढू नये यासाठीआणखी 10 दिवस म्हणजेच 10 जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून आता 20 जूनपर्यंत निर्बंध असणार आहेत.
यावेळी सरकारी कार्यालय सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. आदेशात जारी केल्या प्रमाणे दुपारी 2 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजेपर्यंत कर्फ्यू जारी असेल. तर सीआरपीसी कलम 144 च्या अंतर्गत निषेधाज्ञा सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असेल.
आंध्र प्रदेशात रविवारी सायंकाळी कोरोनाचे 8,976 नवे रुग्ण आढळून आले. तर 90 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच 13,568 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण रुग्णांची संख्या 17.58 लाख वर पोहचली असून त्यातील 16 लाख 23 हजार 426 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 11,466 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 1,23,426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.