ऑनलाईन टीम / हैदराबाद :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आंध्र प्रदेश सरकारने राज्यात सुरू असलेला कोरोना कर्फ्यू 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र, आता कर्फ्यूची वेळ 4 तासांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता 21 जून पासून सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे.
मुख्यमंत्री वाय. एस. जगन रेड्डी यांनी शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत याबाबत घोषणा केली. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रदेशात 5 मे ते 20 जून या काळात टप्प्याटप्याने कर्फ्यू जारी करण्यात आला होता. प्रदेशात रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे, पण रुग्ण संख्या पुन्हा वाढू नये यासाठी आज पुन्हा एकदा कर्फ्यूमध्ये 30 जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती.
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठान सायंकाळी 5 वाजता बंद केले जातील. तर सायंकाळी 6 ते सकाळी 5 या काळात कर्फ्यू जारी असणार आहे. तर सरकारी कार्यालये आता सामान्य वेळेत सुरू असणार आहेत.
दरम्यान, पूर्वी गोदावरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथे दुपारी 2 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू जारी असणार आहे.
आंध्र प्रदेशात मागील 24 तासात कोरोनाचे 6,151 नवे रुग्ण आढळून आले. तर 58 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच 7,728 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण रुग्णांची संख्या 18,32,902 वर पोहचली असून त्यातील 17 लाख 50 हजार 904 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 11,466 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 69, 831 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.