जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केल्या सूचना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात उत्पादित होणाऱया आंबा, काजू, मच्छीच्या निर्यात वृद्धीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावरून पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा निर्यात प्रचालन परिषदेच्या पहिल्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिह्याचा ‘ऍक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत.
जिह्यात आंबा, काजू आणि मच्छीचे उत्पादन होते. परंतु निर्यात होत नाही. त्यासाठी या बैठकीत प्रकर्षाने चर्चा झाली. निर्यात वृद्धीसाठी राज्य निर्यात प्रचालन परिषद (एमईपीसी) स्थापन केली. त्या अंतर्गत जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, दीपक गद्रे, अमर देसाई, जयवंत विचारे, ऋषिकेश परांजपे, जिलानी मरीन प्रोडक्टस्चे पदाधिकारी, विदेश व व्यापार संचालनालय, एमएसएमबी, पणन, कृषी, आत्मा, मत्स्यचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी निर्यातीत येणाऱया समस्या मांडल्या.
काजू निर्यातीसाठी केरळ पॅश्यू एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल कार्यरत आहे. त्यातील विविध योजनांद्वारे सबसिडी, अर्थसहाय्य होते. त्याचे विभागीय कार्यालय रत्नागिरीत झाल्यास काजू बागायतदारांना फायदा होईल. आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेटसाठी येणारा खर्च अनुदान रूपाने मिळाल्यास नोंदणीला प्रतिसाद वाढेल. न्हावाशेवा बंदरावर कच्चा माला ने-आण परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे आहे. स्थानिक बॅंकाकडून फंडींगसाठी सहकार्याची भावना आवश्यक आहेत, अशा सूचना व्यावसायिकांनी केल्या.