दुचाकी, हलक्या वाहनांना लवकरच परवानगी
वार्ताहर/ साखरपा
अतिवृष्टीमुळे आंबा घाटाला लागलेले ग्रहण अजून संपलेले नाही आहे. याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता खचलेल्या ठिकाणी विरुद्ध बाजूला रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या सुरू असलेले बांधकाम ओलसर असल्याने ते सुकण्यासाठी कालावधी लागणार असल्याने सर्वच प्रकारच्या वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱयांच्या पाहणीनंतरच घाटातून वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, दोन ते तीन दिवसात फक्त दुचाकी, हलक्या चारचाकी वाहनांसाठी मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.
घाटामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. सोमवारी रस्ता पाहणीवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरसिंह पाटील, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक संजय उकार्डे, संसारे उपस्थित होते. अवजड वाहतूक बंद असल्याने कोकणातील बंदरातून कोल्हापूर, सोलापूर, हैद्राबद, मध्य महाराष्ट्रात जाणारा कोळसा, क्रूड ऑइल, तांदूळ आदींची वाहतूक ठप्प आहे. तर कोल्हापुरातून कोकणात येणारे अन्नधान्य, भाजीपाला, साखर, तेल आदींची वाहतूक बंद आहे. त्यामुळे अवजड वाहने सुरू होण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.