जिल्हय़ात पोलिसांची पहिलीच कारवाई
प्रतिनिधी / देवगड:
आंबा वाहतुकीस दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करीत जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे उल्लंघन करून मुंबईहून येताना नातेवाईकांना घेऊन आल्याप्रकरणी गढीताम्हाणे येथील महिंद्रा पिकअप चालक काशीराम बाबू भांडये (32) याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महिंद्रा पिकअप जीपही जप्त करण्यात आली आहे. आंबा वाहतुकीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी जिल्हय़ात प्रथमच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादनाचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱयांनी मुंबई व अन्य बाजारपेठांमध्ये आंबा वाहतुकीस परवानगी दिलेली आहे. त्यानुसार 2 एप्रिल रोजी गढीताम्हाणे येथील महिंदा पिकअप चालक काशीराम भांडये हे आंबा पेटय़ा घेऊन मुंबईमध्ये गेले होते. मुंबईहून परतताना मुंबईतील आपले चार नातेवाईक घेऊन घरी गढीताम्हाणे येथे आणले. मुंबईमध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव असताना व जिल्हाधिकाऱयांच्या मनाई आदेशाचे पालन न करता लोकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होईल तसेच रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेले हयगयीचे व घतकी कृत्य केल्याप्रकरणी चालक भांडये याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक नित्यानंद पारधी करीत आहेत.