रत्नागिरी, सिंधुदुर्गात कार्यरत : स्थानिक मजुरांप्रमाणे सर्व कामांत माहीर : जिद्द, चिकाटी, कामातील सातत्य उल्लेखनीय
प्रशांत वाडेकर / देवगड:
रत्नागिरी जिल्हा व सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात मोठय़ा प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते. दोन्ही जिल्हय़ांमध्ये सुमारे 20 हजाराहून अधिक आंबा बागायतदार आहेत. आंबा व्यवसाय हा पूर्वी स्थानिक मजुरांवर चालायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत आंबा व्यवसायातील रोजगार नेपाळी कामगारांनी काबीज केला आहे. स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने आता रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ांत सुमारे दोन लाख नेपाळी कामगार आंबा व्यवसायातून रोजगार मिळवत आहेत. जिद्द, चिकाटी व काम करण्याची क्षमता हे गुण नेपाळी कामगारांमध्ये असल्याने नेपाळी कामगारांची आंबा हंगामासाठी मागणी वाढू लागली आहे.
हापूस आंबा हा अत्यंत गोड! त्याची चव चिभेवर तरळत राहते. हापूस आंबा खवय्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहा महिने बागायतदार विशेष मेहनत घेतात. पावसाळय़ानंतर कलमांना खत व फवारणीला सुरुवात होते. शंभर ते हजार कलमे असलेल्या बागा असतात. त्यामुळे साहाजिकच मजुरांची आवश्यकता भासते. पूर्वी स्थानिक मजूर मोठय़ा प्रमाणात उपलब्ध व्हायचे. तेव्हा आंबा बागायतीही कमी होत्या. आता आंबा बागायतींचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक मजूर हे चिरेखाण, गवंडी व अन्य कामाकडे वळले आहेत. काही मजूर हे स्वत: छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात आंबा व्यवसाय करू लागले. त्यामुळे स्थानिक मजुरांची कमरता मोठय़ा प्रमाणात भासू लागली. नेपाळी कामगार हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून कोकणात येत आहेत. हे नेपाळी कामाच्या शोधात कणकवली, रत्नागिरी रेल्वे स्थानकात येऊन थांबायचे. सुरुवातीला आंबा बागायतींची राखण ते करायचे. सुरक्षा रक्षकाचे काम ते चांगले करीत असल्यामुळे बागांमध्ये होणारी आंबा चोरी, माकड किंवा अन्य प्राण्यांचा उपद्रव कमी झाला. कालांतराने नेपाळी कामगार बागायतींमध्ये काम करू लागले. स्थानिक मजूर मिळत नसल्याने नेपाळी मजुराचा पर्याय बागायतदारांना खुला झाला. बागेतील कामाच्या प्रशिक्षणानंतर तरबेज झालेल्या या नेपाळी कामगारांनी गावातील आपले सहकारीही सोबत आणले. कामचुकारपणा हा शब्दच त्यांच्या ‘डिक्शनरी’त नाही. स्थानिक मजुरांप्रमाणेच दिवसाला तीनशे रुपयांची मजुरी ते घेतात.
देवगड तालुक्यातील वरेरी येथील युवा बागायतदार रुपेश पारकर यांनी सांगितले, बागायतीमध्ये सहा महिन्यांसाठी मजुरांची आवश्यकता असते. पूर्वी आमच्याकडे शंभरहून अधिक स्थानिक मजूर काम करायचे. आता स्थानिक मजूर कमी झाल्याने नेपाळी कामगार आहेत. कलमावरील तयार आंबा कसा ओळखावा? प्रतवारी कशी करावी, हे सर्व शिकविल्यानंतर ते उत्तमरित्या काम करतात. बागांची राखणही ते प्रामाणिकपणे करतात. महिन्याचा पगार ठरवून हंगाम संपल्यावर एकूण रोजगार दिला जातो.
कामात नेपाळय़ांची क्षमता अधिक
हंगामात जर मजुराने एक दिवस जरी दांडी मारली, तरी बागायतदाराचे मोठे नुकसान होते. स्थानिक मजूर आजाराचे कारण, लग्न, बारसा व अन्य समारंभाची कारणे सांगून ऐनवेळी दांडय़ा मारतात. मात्र, नेपाळी मजूर कामामध्ये दांडी मारत नाही. नेपाळी हा स्थानिक मजुरांपेक्षा जास्त क्षमतेने काम करतो. कधी कारणे सांगत नाही किंवा जादा कामाचे पैसेही घेत नाही. त्यामुळे आंबा बागायतदार आता सर्रास नेपाळी मजूरच वापरतात, असे ते म्हणाले.
देवगड तालुक्यातील प्रगतशील आंबा बागायदार सुधीर जोशी म्हणाले, आपण आजही स्थानिक मजुरांनाच महत्व देतो. स्थानिक मजुरांमध्ये जे स्किल आहे, ते नेपाळय़ांमध्ये नाही. नेपाळी हे ‘सांगकामे’ असतात. त्यांना आंब्यामधील जास्त काही माहीत नसते, असं माझं मत आहे. मात्र, आता सर्वच बागायतदार नेपाळी कामगार ठेवू लागले आहेत.
स्थानिक मजुराकडे प्रामाणिकता, माणुसकी
स्थानिक मजूर हे प्रामाणिक व माणुसकीने काम करतात. जेव्हा काम जास्त असते, तेव्हा ते जास्त वेळही काम करतात. त्यांना बागायतदाराकडून वागणूक कशी मिळते, यावर सर्वकाही अवलंबून आहे. हंगामाचे केवळ 20- 25 दिवस सोडले, तर ‘ओव्हरटाईम’ काम नसते. शेवटच्या हंगामात आंबा जास्त असतो, तेव्हाच कामगारांना जास्त वेळ काम करावे लागते. स्थानिक मजुरांनादेखील मजुरी चांगली दिल्यानंतर तेही काम प्रामाणिकपणे करतात, असे जोशी म्हणाले.
विजयदुर्ग सरपंच व आंबा बागायतदार प्रसाद देवधर म्हणाले, स्थानिक मजूर बागायतींमध्ये काम चांगले करतात. मात्र, आता स्थानिक मजूरच मिळत नाहीत. त्यामुळे नेपाळी कामगारांशिवाय बागायतदारांकडे पर्याय नाही. महिन्याला 12 हजार रुपये पगारावर नेपाळी काम करतात. आपण ‘ओव्हरटाईम’चे जादा पैसेही त्यांना देतो. नेपाळी मजूर दिलेले काम चिकाटीने करतात, असे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हय़ातील रिळ येथील युवा बागायतदार ओंकार महाडिक म्हणाले, आमच्याकडे बागायतीच्या कामासाठी पूर्वी स्थानिक मजूरच होते. स्थानिक मजुरांना बारा महिने काम द्यावे लागते. आंबा हंगाम हा केवळ सहा ते आठ महिन्यांचाच असतो. त्यामुळे स्थानिक मजुरांना उर्वरित महिन्यांत काय काम देणार, हा प्रश्न असायचा. मजूर सांभाळून ठेवले नाहीत, तर ऐन हंगामात मजूर मिळत नाहीत. मात्र, आता नेपाळी मजुरांचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
हंगाम संपल्यानंतर मोबदला
नेपाळी मजूर हा बागेमध्ये कलमे चोखाळणी, खते, औषधे फवारणी, आंबे काढणी, सॉर्टींग व पेटय़ा भरण्यापर्यंतची कामे करतो. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत न थकता नेपाळी काम करतो. त्यांना जादा कामाचे पैसेही दिले जातात. हंगाम संपल्यानंतर हिशेब करून त्यांना ठरलेला मोबदला दिला जातो. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्थादेखील करावी लागते, असे त्यांनी सांगितले.
अनेक क्षेत्रात नेपाळी मजूर
नेपाळ हा भारताच्या सीमेलगतचा देश आहे. त्यामुळे पासपोर्टची गरज लागत नाही. केवळ आधारकार्ड दाखवून नेपाळय़ांना भारतात प्रवेश मिळतो. नेपाळमध्ये रोजगार उपलब्ध नसल्याने नेपाळी भारतात येऊ लागले. आज अनेक क्षेत्रात नेपाळी मजूर आहेत. मासेमारी व्यवसायातही नेपाळी खलाशी म्हणून काम करीत आहेत. ‘मिळेल ते काम करण्याची धमक’ या वृत्तीमुळे नेपाळी मजुरांना येथे सहज रोजगार मिळू लागला आहे. नेपाळी कामगारांची संख्या लक्षणीय असली, तरी स्थानिक मजुरांच्या कामातील कौशल्यामुळे काही बागायतदार स्थानिकांनाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.