सातारा : पाटण तालुक्यातील विविध गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामध्ये मोठया प्रमाणात जिवीत हानी झाली आहे. या बाधितांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून बाधितांचे चांगल्या पध्दतीने पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
कोयनानगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत अतिवृष्टीमध्ये मयत झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाचे धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वारसांना वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. याप्रसंगी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सत्यजित पाटणकर आदी उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या भूस्खलनातील जिवीत हानीबरोबर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. मिरगाव येथे बचाव कार्यासाठी रस्ते नव्हते कोयनेच्या बॅक वॉटरमधून एनडीआरएफच्या टीमने व स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले. आपत्तीग्रस्तांच्या भावना मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडल्या जातील. भविष्यात भूस्खलनाची थोडीतरी कल्पना आली तरी त्याची तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी, असे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.