नाहरकत दाखला देण्यासाठी हॉटेल व्यवसायिकाकडे केली 3 हजारांची मागणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखल देण्यासाठी हॉटेल व्यवसायिकाकडे 3 हजार रुपायांची मागणी करणाऱ्या आंबेवाडी (ता. करवीर) ग्रामपंचायीतच्या शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी सकाळी जेरबंद केले. शिवाजी दत्तात्रय चौगले (वय 43, रा. शिवनगर आंबेवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हय़ात जुलै महिन्यात आलेल्या महापूरामुळे आंबेवाडी परिसरातील हॉटेल व परमिट रुम व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. तक्रारदार हे हॉटेल व परमिट रुम व्यवसायिक असून त्यांचेही यामध्ये नुकसान झाले आहे. नुकसानीच्या पंचनाम्यासाठी व्यवसाय सुरु असल्याबाबत सरपंचांची सही असलेला नाहरक दाखला जोडणे आवश्यक होते. हे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी दाखल्या संदर्भात आंबेवाडी ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केली. तसेच दाखला मिळण्यासाठी रितसर अर्ज केला. यावेळी शिपाई चौगले यांनी दाखला देण्यासाठी तक्रारदारांकडे 3 हजार रुपयांची मागणी केली.
यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांची भेट घेवून तक्रार दाखल केली होती. तक्रारीची खात्री केली असता शिपाई चौगुले यांनी तक्रारदाराकडे 3 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शिपाई चौगले याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. सापळा पथकामध्ये पोलीस निरीक्षक सतीश मोरे, पोलीस हेड कॉन्सटेबल अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, कृष्णात पाटील, पोलीस कॉन्सटेबल रुपेश माने यांचा समावेश होता.