घाटमार्ग, धबधबा परिसर सुनासुना : वडापाव विक्रेत्यांसमोर रोजीरोटीची चिंता
विजय राऊत / आंबोली:
आंबोली पर्यटनावर स्वत:चा उदरनिर्वाह करणारे हॉटेल व्यावसायिक, चहा-वडापाव विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ऐन पर्यटन हंगामात लॉकडाऊन असल्याने पुढे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आंबोलीत साधारण मार्चनंतर उन्हाळी हंगाम सुरू होतो. कारण इतर सर्वत्र जरी उष्मा असला, तरी या ठिकाणी थंड वातावरण असते. पर्यटक एप्रिल-मे महिन्यात येथे गर्दी करतात. मात्र 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असून पुढचेही काही सांगता येत नाही. तसेच लॉकडाऊननंतरही पर्यटक बाहेर पडतील की नाही, याबाबत शंकाच असून पर्यटनावर अवलंबून असणाऱया हॉटेल व्यावसायिकांचे हाल होत आहेत. शासन निराधारांची जेवणाची सोय करीत आहे. परंतु हातावर पोट असणाऱयांचे काय? जेवणाची सोय शासनाच्या तांदळातून होईल, परंतु इतर खर्चाचे काय? असा प्रश्न आहे.
घाटरस्ते सुने-सुने
आंबोली हे पर्यटन केंद्र असून गोवा व कर्नाटकला जोडणारा हाच रस्ता आहे. येथे बाराही महिने वाहनांची वर्दळ असते. मात्र सध्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. हॉटेल व्यावसायिक, वडापाव विपेते चिंतेत आहेत. तसेच बँकेचे कर्ज घेऊन माल ने-आण करण्यासाठी टेम्पो खरेदी केले असून हप्ते भरायचे कसा, हा प्रश्न त्यांना पडला आहे. मुख्य धबधब्यानजीक वडापाव विकणारे विजय सावंत म्हणाले, येथे आम्ही सुरुवातीला एकटेच होतो. नंतर हळूहळू बाकीचे गाडे झाले. पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने सामानाची ने-आण करण्यासाठी बँकेचे कर्ज काढून गाडय़ा खरेदी केल्या. पण आता व्यवसायच नसल्याने हप्ते भरणे मुश्किल झाले आहे. लॉकडाऊननंतरही पर्यटक येतील की नाही शंकाच आहे. त्यामुळे घर कसे चालवायचे? असा प्रश्न आहे.
येथील प्राणी अभ्यासक हेमंत ओगले म्हणाले, देशात लॉकडाऊन असल्याने आपण काहीच करू शकत नाही. घरातच बसून कोरोना घालवू शकतो. हे संकट किती दिवस चालेल, हेही सांगणे कठीण आहे. पुढे पावसाळी पर्यटन आहे. परंतु पर्यटक येतील की नाही, याची शक्यता कमी आहे.
आंबोली सरपंच रोशनी पारधी म्हणाल्या, आंबोली हे पर्यटन केंद्र असून लॉकडाऊन उठल्यानंतर पर्यटक हे येणारच. आंबोली गावातील सर्व बारा वाडय़ांवर स्पीकरद्वारे जनजागृती केली आहे. क्लोराईडची फवारणी केली असून सर्व सदस्यांची सभा घेऊन पुन्हा वाडीवार कर्मचाऱयांतर्फे क्लोराईडची फवारणी करण्यात येणार आहे. परगावाहून आलेल्यांना होमक्वारंटाईने करण्यात येत आहे. भाजी विक्रेत्यांनी न फिरता एकाच ठिकाणी एक मीटर अंतर ठेवून भाजी विकायची आहे. आंबोली ग्रामपंचायत योग्य ती खबरदारी घेत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविस्तार अधिकारी मेहनत घेत आहेत. ग्रामस्थही सहकार्य करीत आहेत.
घाटातील माकडांची स्थिती केविलवाणी
जीवनावश्यक वस्तूंचे वगळता कोणतेही वाहन येथून जात नसल्याने पर्यटकांवर अवलंबून असलेल्या माकडांवरही उपासमारीची वेळ आली आहे. रस्त्याच्या कडेला बसून आर्त नजरेने ही माकडे वाहनांची वाट पाहताना दिसतात. एखादी गाडी थांबली, तर गाडीवाले टॉमेटो वगैरे त्यांना देतात.