पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज राष्ट्रार्पण
जय नाईक/ पणजी
आकाशी झेपावण्यास सज्ज झालेल्या मोप आंतरराष्ट्रीय विमानतळवरून आता खऱया अर्थाने विमाने आपले अफाट पंख पसरून ‘सामर्थ्याने विहार’ करणार असून येथील दरी डोंगर, हिरवी राने, सागर सरीता ओलांडून सातासमुद्रापार जाण्यासाठी नभी घेतलेली गरुडभरारी, मुक्त विहार पाहण्यासाठी प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
देशातील सर्वात अत्याधुनिक आणि गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱया अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरलेल्या मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज राष्ट्रार्पण होत आहे. आपल्या याच भेटीदरम्यान पंतप्रधान धारगळ येथे बांधण्यात आलेले आयुष रुग्णालय व संशोधन संस्थेचे लोकार्पण आणि पणजीत सुरु असलेल्या जागतिक आरोग्य परिषदेचा समारोप करणार आहेत. या कार्यक्रमांनिमित्त गोमंतभूमीत उतरणाऱया पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सर्व गोमंतकीय सज्ज झाले आहेत.
जागतिक पर्यटन स्थळ म्हणून लौकिक प्राप्त केलेल्या गोव्यात आता बारामाही पर्यटक येत असतात. त्याशिवाय आंचिम, सेरेंडिपिटी, लुसोफोन, सनबर्न यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक महोत्सव, आंतराष्ट्रीय दर्जाच्या परिषदा दरवर्षी गोव्यात आयोजित करण्यात येत असतात. त्यामुळे पर्यटक, प्रतिनिधी यांची सदैव रेलचेल गोव्यात सुरू असते. या पाहुण्यांच्या येण्या-जाण्यासाठी आतापर्यंत दाबोळी हा एकमेव विमानतळ उपलब्ध होता. परंतु त्याची प्रवाशी हाताळण्याची क्षमता आणि गोव्याकडे येणाऱया पर्यटकांचा ओघ यांचा ताळमेळ जुळत नसल्याने गोव्यासाठी नवीन विमानतळाची गरज प्रकर्षाने जाणवत होती.
गेल्या कित्येक वर्षांचे हे स्वप्न आता मोप विमानतळाच्या रुपाने सत्यात येत असून पंतप्रधानांच्या हस्ते आज त्याचे राष्ट्रार्पण होत आहे. गोव्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱया या विमानतळामुळे गोवा खऱया अर्थाने आंतरराष्ट्रीयस्तरावर स्वतःची छाप पाडणार असून पंतप्रधानांचे विमान उतरल्याच्या क्षणापासून हा विमानतळ लोकांच्या सेवेसाठी कार्यरत होणार आहे.
या विमानतळाच्या बरोबरीनेच पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते देशातील तीन आयुष इस्पितळांचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यात गोव्यात पेडणे तालुक्यात धारगळ येथे बांधण्यात आलेले आयुर्वेद इस्पितळ, दिल्लीत बांधण्यात आलेले ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथी तसेच गाझियाबाद येथे बांधण्यात आलेल्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ युनानी या इस्पितळांचा समावेश आहे. पैकी दिल्ली आणि गाझियाबाद येथील इस्पितळांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दूरस्थ पद्धतीने गोव्यातूनच लोकार्पण करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांचे 2 वाजता गोमंतभूमीत आगमन
पंतप्रधान मोदी यांचे विमान दुपारी 2 वाजता मोप विमानतळावर उतरेल. त्यानंतर नौदलाच्या खास हॅलिकॉप्टरने ते ताळगाव येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमजवळ हॅलिपॅडवर उतरतील. तेथून ताळगाव, दोनापावल, मिरामार ते कांपाल असा रस्तामार्गे प्रवास करत कार्यक्रमस्थळी पोहोचतील. पंतप्रधान प्रारंभी चार दिवस चाललेल्या जागतिक आयुष परिषदेत सहभागी होतील व त्यांच्याच उपस्थितीत परिषदेचा समारोप करण्यात येईल. तसेच या परिषदेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य एक्स्पो महाप्रदर्शनालाही पंतप्रधान भेट देतील, अशी शक्यता आहे.
सायंकाळी 5 वा. जाहीर सभा
हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा रस्तामार्गे ताळगाव स्टेडियमजवळ पोहोचून तेथून हॅलिकॉप्टरमधून मोप विमानतळाकडे प्रयाण करतील. तेथे सायंकाळी 5 वाजता त्यांच्याहस्ते विमानतळाचे राष्ट्रार्पण करण्यात येईल. त्यानंतर ते जाहीर सभेलाही संबोधित करतील.
राज्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था
दरम्यान, पंतप्रधानांच्या आगमनानिमित्त राज्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या भेटीच्या काळात दुपारी 1 वाजल्यापासूनच राजधानीतील अनेक रस्ते सार्वजनिक वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येणार आहेत. तरीही वाहतूक व्यवस्थेत कोणताही घोळ होऊ नये यादृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. त्याशिवाय पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले राखीव पोलीस दल, विशेष सुरक्षा पथक, जलद कृती दल, राखीव बटालीयन यांचे जवान यापूर्वीच गोव्यात दाखल झाले असून सुरक्षा व्यवस्था त्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. या जवानांच्या मदतीसाठी स्थानिक वाहतूक पोलीस तसेच गृहरक्षक दलाचे स्वयंसेवकही सज्ज राहणार आहेत.
अशीच कडेकोट सुरक्षा मोप विमानतळ परिसरातही ठेवण्यात आली असून मोप येथे स्थापन करण्यात आलेल्या नवीन पोलीस स्थानकाला मोठय़ा प्रमाणात फौजफाटा पुरविण्यात आला आहे. त्याद्वारे बंदोबस्तात कोणतीही कसर राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या आगमनाच्या तयारीचा भाग म्हणून शुक्रवार, शनिवार असे दोन दिवस हॅलिकॉप्टर आणि वाहनांच्या ताफ्याने हवाई तसेच रस्ता मार्गावर रंगीत तालीम घेतली.
2016 मध्ये मोपची पायाभरणी
नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मोप विमानतळाची पायाभरणी करण्यात आली होती. परंतु दरम्यानच्या काळात आलेल्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रश्न, शेतकऱयांच्या मागण्या, वृक्षतोडीवरून झालेली टीका, यासारख्या असंख्य अडचणींचा सामना करताना प्रत्यक्ष बांधकामात बराच उशीर झाला. त्याशिवाय कोरोनाच्या मोठय़ा संकटाचाही सामना करावा लागल्याने सुमारे दोन वर्षे काम बंद ठेवावे लागले. सुमारे सहा वर्षांनंतर आता हे काम पूर्णत्वास आले आहे.
रात्रीचे पार्किंग, माल हाताळणी सुविधा ः मोपचे वैशिष्टय़
राज्यातील एकमेव असलेल्या दाबोळी विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे 8.5 दशलक्ष एवढी आहे. मोप कार्यान्वित झाल्यानंतर ही क्षमता 13 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची शक्मयता आहे. दाबोळी विमानतळ देशांतर्गत 15 आणि आंतरराष्ट्रीय 6 स्थानकांशी थेट जोडलेले आहे तर मोपच्या माध्यमातून ही संख्या देशांतर्गत 35 आणि आंतरराष्ट्रीय 18 ठिकाणे एवढी वाढणार आहे. त्याशिवाय मोप विमानतळावर रात्रीचे पार्किंग तसेच तब्बल 25 हजार मेट्रिक टन माल हाताळणी यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.