रोज येणारी कोरोना आकडेवारी थरकाप उडवत आहे. औषध व लस यांची टंचाई व राजकारण चीड आणते आहे त्यातच तोंडावर निवडणुकीचा निकाल आणि शंभर कोटी वसुली प्रकरणाचा सीबीआय चौकशी अहवाल यायचा आहे. ओघानेच आगामी काळ कसोटीचा आहे. परीक्षेचा आहे. या काळात राजकारण काहीही होवो, होत राहो पण जनसामान्यांचे प्राण जात आहेत. आयुष्यभराची पुंजी खर्च होते आहे आणि घरात कोंडले गेलेले आत्मे भरकटायला लागले आहेत. संयम, सावधानता आणि नियमांचे पालन हाच या समस्येवर उपचार आहे. पण सारेच बेभान झाले आहेत आणि कोरोना आकडेवारी फुगते आहे. गेले वर्षभर छळत असलेली कोरोना महामारी तीव्र रूप धारण करते आहे आणि माणसांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. कोरोनाचे जे दहा टॉप हॉटस्पॉट झाले आहेत त्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद, नांदेड, भंडारा, अहमदनगर या दहा जिह्यांचा समावेश आहे. एकीकडे संचारबंदी आहे. सरकारी आदेश व योजना आहेत. पण प्रत्यक्षात कोरोनाची महामारी फैलावते आहे. कालचा दिवस बरा असा आजचा दिवस समोर येतो आहे. या महामारीने जगभर आजअखेर 30 लाख जणांचे बळी घेतले आहेत. पण ही महामारी अजून काबूत आलेली नाही. लसीचा शोध व लसीकरण हे कोरोना युद्धातील महत्त्वाचे पाऊल होते व ते आता उचलले गेले आहे. तथापि संयम, शिस्त, नियमांचे पालन या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष होते आहे. रुग्ण संख्या प्रचंड फोफावते आहे. त्यामुळे यंत्रणा हबकली आहे. त्यातच संकटातही खिसे भरणाऱया प्रवृत्ती अर्थात मडय़ाच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरसावले आहेत. औषध टंचाई, प्राणवायुची टंचाई, व्हेंटिलेटरची उपलब्धता याचबरोबर बोगस औषधे असे प्रकार पुढे येत आहेत. बारामतीत रिकाम्या रेमडीसिव्हर बाटल्यात अन्य औषध भरुन भरमसाठ किंमतीला विकणारी टोळी सापडली आहे तर मुंबईत सेवाभावी वृत्तीने रेमडीसिव्हर उपलब्ध करून देणाऱया एकाला मंत्र्यांच्या पीएने धमकावून पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवल्याचा संतापजनक प्ा्रकार समोर झाला आहे. केंद्र व राज्य यांचे संबंध व सहकार्य याबाबत उजेडच आहे. त्यातच नाना अफवा आणि संभ्रम सोशल मीडियावरुन पसरवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचा फोन पंतप्रधानांनी घेतला नाही अशी अफवा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक भलतेच बोलत आहेत तर त्यांचे नेते शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे वेगळेच सांगत आहेत. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजकारण बाजूला ठेऊन औषधे व प्राणवायु उपलब्ध व्हावा म्हणून सरकारात्मक पावले टाकताना दिसत आहेत. लसीकरण जसे वाढत जाईल तसा कोरोना आटोक्यात येईल पण पुढील काही दिवस अनेक अर्थाने कसोटीचे आहेत. महाराष्ट्रात अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांची गाडी,मनसुख हिरेन यांची हत्या, वाझे प्रकरणी गृहमंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा आदी प्रकरणे शांत झाली आणि रेमडीसिव्हर व प्राणवायु टंचाई असे विषय तेजीत आले असे वाटत असले तरी ती वादळापूर्वीची शांतता म्हणावी लागेल कारण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंधरा दिवसात सीबीआयला शंभर कोटी वसुली संदर्भात अहवाल सादर करायचा आहे आणि हे पंधरा दिवस आता शेवटच्या टप्प्यात आहेत. हा अहवाल काय येतो यालाही महत्त्व आहे. या अहवालानंतर राज ठाकरेंच्या भाकिताप्रमाणे फटाक्याची माळ लागते का हे बघावे लागेल. पण हे प्रकरण गंभीर आहे. पाठोपाठ पश्चिम बंगाल, आसाम येथे कसे निकाल येतात, पंढरपूर विधानसभा व बेळगाव लोकसभा निकाल काय लागतो याकडेही सर्वांचे लक्ष आहे. भाजपाला आसाममधील आपली सत्ता टिकवायची आहे व पश्चिम बंगालमधील सत्ता ममतादीदीकडून खेचून घ्यायची आहे. बंगालमधील यश हे सन 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपासाठी महत्त्वाचे मानले जाते आहे. बंगालमधील परिवर्तन देशाच्या राजकारणाला हादरा देणारे ठरणार आहे. ओघानेच या निवडणुकीकडे व निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचे निवडणूक व्यूहकार प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार तेथे भाजपाने कितीही शक्ती लावली तरी भाजप तीन आकडी यश मिळवणार नाही. दीदीच पुन्हा सत्ता मिळवणार. प्रशांत किशोर आणि त्यांची कंपनी निवडणुकीत वेगवेगळे प्रयोग करण्यात आणि यश खेचण्यात माहिर आहे. महाराष्ट्रात याच प्रशांत किशोर यांचा सल्ला घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर काय चमत्कार दाखवतात हे बघायचे. पण तेथे महिला, मागासवर्गीय व मुस्लीम मते ममताच्या पारडय़ात पडावीत अशी व्यूहरचना दिसते आहे. भाजपानेही मोठी ताकद लावली आहे. भाजपा पश्चिम बंगालमध्ये टोलेजंग पक्ष म्हणून पुढे येणार हे पक्के झाले आहे. मोदी-शहा यांची कसोटी लागली आहे. व भाजप इतर पक्ष लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रातही पंढरपूर निकाल महत्त्वाचा ठरेल. ही राष्ट्रवादीची जागा आहे पण मतदानादिवशी अटीतटी दिसली तेथे करेक्ट कार्यक्रम कोण करतो हे बघायचे पण या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरकार केव्हा पाडायचे ते माझ्यावर सोडा, निवडणूक जिंकायला मला पावसात भिजावे लागत नाही वगैरे केलेली विधाने सूचक आहेत. या सगळय़ाचा अर्थ एकच आहे आगामी काळ कसोटीचा आहे. परीक्षेचा आहे. यंदा शालेय विद्यार्थी परीक्षेशिवाय वरच्या वर्गात गेले. शाळेचे एक बरे असते. तेथे धडे दिले जातात व मग परीक्षा घेतली जाते. पण जीवनात व राजकारणात तसे नसते. तेथे परीक्षा घेतली जाते व धडे आपोआप मिळतात. आला तर नंबर येतो नाहीतर फेकला जातो. एकूणच हा परीक्षेचा काळ आहे. संयमाचा काळ आहे. या परीक्षेला उतरणे आणि यशस्वी होणे गरजेचे आहे.
Previous Articleजगाला पीडीएफची भेट देणारा काळाच्या पडद्याआड
Next Article उद्धवाची विनंती
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.