सचिवांची माहिती ः निधी उभारण्याची सरकारची धडपड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने पुनर्गुंतवणुकीचे ध्येय निश्चित केले आहे, ते पूर्ण करण्यासाठी आता मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील टप्प्यातील 6 ते 10 विमानतळांच्या खासगीकरणाची प्रक्रिया वेगाने करण्यात येणार असल्याची माहिती नागरि उड्डाण सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी नुकतीच दिली आहे. विमानतळांच्या खासगीकरणाची मूळ प्रक्रिया मात्र एप्रिल 2021 पासून सुरु होणार असल्याचे सचिवांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने खासगीकरणामध्ये समावेश करण्यात येणाऱया विमानतळांची चाचपणी सुरु केली आहे. सदर विमानतळे खासगी कंपन्यांना 50 वर्षांसाठीच्या कालावधीकरीता देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये विमानतळाची देखभाल, विकास आणि अन्य कामे कंपन्यांना पहावी लागणार आहेत.
नुकसानीतील विमानतळांना दिलासा ?
प्रदीप खरोला यांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार 2021-22 मधील अर्थसंकल्पातील तरतुदीचा आधार घेत हवाई क्षेत्रातील प्रस्तावांची माहिती दिली आहे. सदर प्रस्तावामध्ये नफा आणि नुकसानीत असणाऱया विमानतळासाठी पॅकेज देण्यासोबत त्यांना नफ्यातील विमानतळासोबत जोडले जाणार असल्याची माहिती आहे.
आतापर्यंत झालेले खासगीकरण
प्रतियोगी निविदा प्रक्रियेच्या अंतर्गत सरकारकडून आतापर्यंत दोन टप्प्यातील सहा विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम आणि मंगळूर आदी विमानतळांचा समावेश आहे.