प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामीण भागाशी नाळ असणाऱया शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवून आपला ब्रँड तयार केला आहे. कोराना विषाणूचा धोका अद्यापही टळलेला नाही. मात्र आता कोरोनासोबत जगणे काळाची गरज बनली आहे. यामुळे शिवाजी विद्यापीठाने आगामी शैक्षणिक वर्षापासून एकुण सिलॅबसच्या 30 टक्के सिलॅबस ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या कार्यकालाची मुदत संपत आल्याने शनिवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी ‘दैनिक तरुण भारत ’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) आनंद साजणे, जाहिरात व्यवस्थापक (शहर) मंगेश जाधव, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. यामुळे आता स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे बनले आहे. फिजीकल डिस्टन्सींग केवळ फॉर्म्यालिटी म्हणून न पाळता ती लाईफस्टाईल करणे काळाची गरज बनली आहे.
प्रत्येकाने मुलभुत विचार आणि मानसिकता बदलणे गरजेचे बनले आहे. सकारात्मक मानसिकता करुन जगल्यास कोरोनाला हरवणे नक्कीच शक्य होणार आहे. याचाच एक भाग म्हणून शिवाजी विद्यापीठानेही आता काळानुरुप बदल करण्याचे ठरवले आहे. आगामी शैक्षणिक वर्षामध्ये बी. ए, बी. कॉम, बी. एस्सी यासह विविध अभ्यासक्रमांचा 30 टक्के सिलॅबस ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येणार आहे. यासाठी ई-कंटेन्ट तयार करण्याचे काम सुरु आहे. सद्या 1 हजार लेप्चरचा इ-कंटेट तयार करण्यात आला आहे. यासाठी 2 स्टुडिओ तयार करण्यात आले आहेत.
शिवाजी विद्यापीठाचा पाया ग्रामीण भागावर अवलंबून असतानाही विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन प्राप्त केले आहे. गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन डॉक्युमेंट अशा विविध विद्यार्थीकेंद्रीत निर्णय राबविण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा
कोरोनामुळे सद्या सर्वच क्षेत्रामध्ये अस्थिर वातावरण तयार झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे आगामी शैक्षणिक वर्षाबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा. म्हणजेच सर्वांच्या गुणवत्तेचे समान मुल्यांकन केल्यासारखे होईल. यामुळे सर्व देशातील शैक्षणिक वर्षाबाबत राष्ट्रपती महोदयांनी निर्णय घ्यावा असे मत कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.
1 ते 31 जुलै दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सद्या सर्वत्र गोंधळ सुरु आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने 1 ते 31 जुलै दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात अशा सुचना केल्या आहेत. याबाबत अद्यापही निर्णय सुरु आहेत.
मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील विद्यापीठांपेक्षा कोल्हापूरमध्ये वेगळा अनुभव आला. कोल्हापूरातील नागरीक सजग आहेत. येथील नागरीकांनी मोकळेपणाने कसे जगायचे हे शिकवले असल्याचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. तसेच 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक यांना केंद्रबिंदू समजून काम केले. विद्यापीठातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम केले. मात्र काही गोष्टी करायच्या राहून गेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे