मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेस आपचे उत्तर : भाजपमधीलच सुत्रांनी बिंग फोडल्याचा दावा
प्रतिनिधी /पणजी
आग लागल्याशिवाय धूर येत नाही, आणि पूर्णपणे पोखरलेल्या घराला कितीही रंगरंगोटी केली म्हणून ते कोसळल्याशिवाय राहात नाही, अशा शब्दात आम आदमी पक्षाने भाजपच्या मुख्यमंत्री बदलासंबंधी चाललेल्या चर्चेला उत्तर दिले आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत वाल्मिकी नाईक, ऍड. अमित पालेकर आणि विघ्नेश आपटे यांची उपस्थिती होती. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी गोव्यात मुख्यमंत्री बदलाचे संकेत दिल्यानंतर भाजपकडून आलेल्या गुळमुळीत उत्तरावर आपने वरीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे. सिसोदिया यांच्या दाव्यानंतर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. परंतु कुणीच ठामपणे त्याला होकारही दिला नाही किंवा नकारही दिलेला नाही. नेहमीप्रमाणे प्रत्येकाने केवळ आम आदमी पार्टीवर दोषारोप केले. त्यावरून सिसोदिया यांच्या दाव्यात तथ्य असल्याचेच स्पष्ट होत आहे, असे वाल्मिकी म्हणाले.
दुसऱयावर आरोप करण्यापूर्वी भाजपने स्वतःच्या बुडाखाली काय जळते ते आधी पहावे, एखादी व्यक्ती आरोप करते तेव्हा आग लागल्याशिवाय धूर येत नाही, याची जाण ठेवावी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबद्दल अशाप्रकारचे वृत्त पसरणे हा काही योगायोग नव्हता. भाजपमधीलच विश्वसनीय सुत्रांनी ती बातमी सिसोदिया यांच्यापर्यंत पोहोचविली असण्याची शक्यता आहे. कारण दोन आठवडय़ापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यात येऊन जातात, त्यावेळी सर्व मुद्यांवर चर्चा झालेली असतानाही लगेच मुख्यमंत्री आणि भाजप वरिष्ठ पदाधिकाऱयांचे दिल्लीस जाणे, तसेच त्यानंतर एक-दोन दिवसातच मुख्यमंत्र्यांचे खाजगी सुट्टीवर अज्ञातस्थळी जाणे, हे सर्व प्रकार काय दर्शवतात? त्याचे उत्तर भाजपनेच द्यावे, असे ऍड. पालेकर यांनी सांगितले. सर्वच माणसांना तुम्ही वारंवार मुर्ख बनवू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
भाजपच्या खोटारडेपणाचा वाचला पाढा
वाल्मिकी यांनी पुढे बोलताना मुख्यमंत्री आणि भाजप यांच्या गत दहा वर्षातील अपयशे आणि खोटारडेपणाचे पाढे वाचायचे ठरविल्यास आपण त्यावर तासभर बोलू शकतो, असे सांगून कित्येक उदाहरणे दिली. त्यात प्रामुख्याने ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू न झाल्याचे सांगणे, कोरोना व्हॉरियर्सना 20 टक्के पगारवाढ देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणे, कोरोनामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबास 5 हजार रुपये भरपाईचे आश्वासन देऊन फसवणूक, खाणी सुरू करण्याचे आश्वासन देऊन हजारो अवलंबितांना दहा वर्षांपासून झुलवत ठेवून फसवणूक, हर घर जल च्या नावाने फसवणूक, खुल्या जागेत शौचमुक्तीचे उद्दीष्ट 100 टक्के साध्य केल्याचे सांगून फसवणूक, 10 हजार नोकऱयांचे आश्वासन देऊन फसवणूक, यासारख्या कित्येक मुद्यांचा त्यात समावेश होता.
खाण अवलंबित कधीच माफ करणार नाहीत
भाजपच्या गडाला खिंड पडली आहे. अंतर्गत धूसफूस, घुसमट चालू आहे, अशावेळी राजा किल्ला सोडून जात नाही. वैयक्तिक कारणासाठी तर निश्चितच जात नाही. याचे तात्पर्य गोमंतकीयांनी जाणून घ्यावे. खाणींच्या विषयात भाजपने गत दहा वर्षांत गोमंतकीयांच्या भावनांशी जो खेळ केला आहे तो कदापी माफ न करण्यासारखाच आहे. याचे उत्तर भाजप किंवा सरकारपाशी आहे का? असा सवाल पालेकर यांनी केला. आज सरकारात जे काही चालले आहे त्यावर बोलण्यासाठी इतरांची गरज नाही, सरकारातील लोकच त्यांचा भांडाफोड करत आहेत. विकास, रस्ते, कोरोना, बेरोजगारी किंवा रोजगार, असा विषय कोणताही असो, प्रत्येक स्तरावर हे सरकार अपयशी ठरले आहे. ’रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे स्वतःच्या मानेला त्रास झाला’, असे वक्तव्य खुद्द उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री करतात, यातच सर्वकाही आले, असे पालेकर म्हणाले. यावर कहर म्हणजे हेच पर्यटनमंत्री राज्यात उच्च दर्जाचे पर्यटक यावे, अशी अपेक्षा बाळगतात हे हास्यास्पदच नव्हे तर या सरकारची कींव वाटावी, असे वक्तव्य आहे, अशी टीका पालेकर यांनी केली. आम आदमी पार्टीने उपस्थित केलेली प्रत्येक समस्या, विषय किंवा आरोपांचे उत्तर भाजपने जनतेला द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
राज्यात सध्या ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट आहे, त्याशिवाय खून, हल्ले, जमीन बळकाव प्रकरणे आणि एकुणच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हे प्रकारही नित्याचेच झालेले आहेत, तरीही गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री गप्प आहेत. अशावेळी कितीही मुख्यमंत्री बदलले म्हणून काहीच होणार नाही. सरकार आतून पूर्णपणे पोखरलेले आहे, त्याच्या चेहऱयावर रंगरंगोटी केली म्हणून ते कोसळणे थांबणार नाही, अशी टीका आपटे यांनी केली.