सध्या कोरोनाने देशभर थैमान घातले आहे. लॉकडाऊन, निर्बंध इत्यांदीमुळे अर्थव्यवस्था मंदावल्याने उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. तथापि या परिस्थितीसमोर हार न मानता आग्य्रातील काही युवकांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारला असून ते आता आपल्या पायावर उभे आहेत. ज्या पद्धतीने या युवकांनी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतले आणि नोकरीवर निर्भर न राहता विविध व्यवसाय सुरू करून स्वतःची आर्थिक उन्नती करून घेतली. ते पाहता त्यांना आत्मनिर्भरतेचे पायिक असे म्हटले जाऊ लागले आहे. या युवकांची ही गौरवगाथा साऱया देशासाठी आदर्श आहे.
गौरव कौशिक याने एमबीए केल्यानंतर वित्त कंपनीत नोकरी घेतली. मथुरा येथील शाखेचे ते व्यवस्थापक होते. वेतनही उत्तम होते. तथापि कोरोनामध्ये त्यांचे वेतन निम्मे करण्यात आले. त्यामुळे प्रचंड तणाव आल्याने ते आजारी पडले. नंतर त्यांनी धाडस करून नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचे दुकान थाटले. आता त्यांचे दुकान उत्तम चालत असून नोकरीची आठवणही होत नाही, असे ते म्हणतात. याच शहरातील अन्य युवक अनुप शर्मा शिक्षण झाल्यानंतर सेल्स सुपरवायझर म्हणून एका कंपनीत कामाला लागले. नोकरी मिळवून काही महिने होतात न होताच तो कोरोनाचे संकट कोसळले आणि नोकरी गेली. त्यांनीही न डगमगता नव्या लोकवसतीत किरकोळ विक्रीचे दुकान घातले. प्रारंभीचे तीन-चार महिने तंगीत आणि कष्टात गेले. पण आता त्यांना घेतलेल्या निर्णयाचे समाधान आहे. भुपेश शर्मा हे एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. कोरोनामुळे वेतन कमी झाले पण जबाबदारी वाढली. शिवाय नोकरीवर केव्हा गदा येईल हे सांगता येत नव्हते. त्यांनीही आत्मनिर्भरतेचा मंत्र आचरणात आणला. बाजारपेठेचा थोडा अभ्यास करून त्यांनी डिटर्जंट साबन पावडर उत्पादन करणारा छोटा कारखाना काढला. शिवाय खाद्यपदार्थांची एक एजन्सीही घेतली. आता त्यांचे दोन्ही व्यवसाय उत्तम चालत असून नोकरी गमावलेला हा युवक आता पाच लोकांना काम देत आहे. चंदन बन्सल यांचीही कथा अशीच आहे. त्यांच्या नोकरीला कोरोनाचा तडाखा बसला. त्यांनी मल्टिमिडियाचा शिक्षणक्रम पूर्ण केला आणि नोकरी सोडून स्वतःचे काम सुरू केले. पहिले सहा महिने अत्यंत कष्टात गेले. निर्णय चुकला की काय? अशी शंका येत होती. तथापि आज ते व्यवसायात सुस्थिर झाले आहेत.