प्रतिनिधी / सांगली
राष्ट्रवादीचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे जिल्ह्यातील शिवसेना आणि शिवसैनिकांवर अन्याय करत आहेत. राज्यात आघाडी एकत्र असताना पाटील हे मात्र शिवसैनिकांची मुस्कटदाबी व दुजाभाव करत आहे. शिवसेनेतर्फे याबाबतचे गार्हाणे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडण्यात आले असून, पाटील हे सत्तेचा गैरवापर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी केला. ते सांगलीमध्ये बोलत होते.
विभुते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून शिवसेना आणि शिवसैनिकांच्यावर अन्याय तसेच दुजाभावाची वागणूक देण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा शिवसेनेकडून मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. राज्यात एकत्र सरकार असताना सांगली जिल्ह्यात मात्र जयंत पाटील हे शिवसेनेवर वारंवार अन्याय करणारी भूमिका घेत आहेत, असा आरोप विभुते यांनी केला. विभुते पुढे म्हणाले, आज राज्यात आघाडीचे सरकार सतेत येऊन एक वर्षाचा काळ लोटला आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिवसेनेसोबत कोणत्याही प्रकारची समन्वय बैठक अद्यापही घेतली नाही. उलट जिल्ह्यातील शिवसैनिकांना शासनसगितीवर स्थान देण्यामध्ये दुजाभाव करणे, त्याच्यावर पोलिसांची भिती दाखवून खोटे गुन्हे दाखल करणे, तसेच पाटील जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार असणार्या अनिल बाबर यांचेही अनेक पातळ्यांवर खच्चीकरण करत असल्याची तक्रार विभुते यांनी केली.
शिवसेना हा पक्ष राज्यात असणाऱ्या आघाडीतील मुख्य पक्ष असूनही त्याची जिल्ह्यामध्ये फरफट सुरू आहे.तसेच शिवसैनिकाना संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदीसुद्धा डावलण्यात आले आहे. त्यामुळे जी पदे आहेत, त्यांचा राजीनामा देणार असल्याचा इशाराही यावेळी विभुते यांनी दिला. जयंत पाटील यांनी त्यांचा पक्ष जरूर वाढवावा, पण त्यासोबत शिवसेनेची कुचंबणा करू नये, असे स्पष्ट मत विभूते यांनी व्यक्त केले.