पाचही खलाशी सुदैवाने बचावले : नौका, जाळी, इंजिन वाचविण्यात यश गाळाने भरलेल्या आचरा बंदर नस्ताचा प्रश्न ऐरणीवर : सातत्याने मासेमारी नौका होताहेत दुर्घटनाग्रस्त
प्रतिनिधी / आचरा:
रविवारी सकाळी आचरा बंदरातून समुद्रात मासेमारीला नौका जात असताना गाळाने भरलेल्या आचरा बंदर नस्तावर नौका आली असता, रुतल्याने अडकून पडली. एका बाजूला नौका कलंडल्याने नौकेत पाणी भरले. ही घटना आज सकाळी 6.30 च्या सुमारास आचरा येथे समुद्रात नस्ताजवळ घडली. नौका दुर्घटनाग्रस्त झाल्याचे समजताच स्थानिक मच्छीमारांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नौकेवरील पाचही खलाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तीन तासांच्या अथक प्रयत्नाने बुडालेल्या नौकेसह जाळी, इंजिन बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले. इंजिनाचे नुकसान झाले. या नस्ताच्या भागात गाळ साठल्यामुळे सातत्याने नौका दुर्घटनाग्रस्त होताहेत. यापूर्वीही काही नौका खडकांवर आदळून फुटण्याचे प्रकारही घडले आहेत. आचरा मच्छीमार हे मेरीटाईम बोर्डाकडे वारंवार हा गाळ उपसा करण्याची मागणी करत आहेत. मात्र, मेरीटाईम बोर्ड याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शासनकर्ते या समस्येकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
आज सकाळी साडेसहाच्या सुमारास आचरा बंदरातून विघ्नहर्ता मासेमारी नौका 5 खलाशांसह आचरा बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात निघाली होती. खाडीतून समुद्रात जाताना आचरा बंदर नस्तावर आली असता, ओहोटीमुळे मासेमारी नौका साठलेल्या गाळात रुतून एका बाजूला कलंडली. नौका रुतल्याने इंजिनही बंद झाले. त्यामुळे एका बाजूला कलंडलेल्या नौकेत पाणी भरत होते.
आचरा मच्छीमारांकडून तत्काळ मदतकार्य
नौका दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळताच आचरा बंदरावरील मच्छीमार चावल मुजावर, मुजावर, असिफ मुजावर, वसीम मुजावर, रियान मुजावर, सतीश आचरेकर आदी मच्छीमारांनी धाव घेत होडय़ांच्या साहय़ाने अपघातग्रस्त नौका गाठली. आतील खलाशांना बाहेर काढत नौकेला व दोरखंड बांधून अडविण्यात आली. नंतर नौकेत भरलेले पाणी काढून दुसऱया नौकेच्या सहाय्याने दोरखंड बांधून अडकलेली नौका बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुर्घटनाग्रस्त पात आचरा बंदरात आणण्यात मच्छीमारांना यश आले. मात्र, नौकेच्या इंजिनात पाणी गेल्याने नुकसान झाले आहे.
नस्तावर नौका दुर्घटनाग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले
आचरा नस्तावर गाळ साचल्याने 16 सप्टेंबर 2018 रोजी मध्यरात्री मासेमारी करून आचरा बंदरात परतत असताना मासेमारी नौका अपघातग्रस्त होऊन समुद्रात उलटली होती. नौकेत पूर्ण पाणी शिरल्याने 17 खलाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. किनाऱयावरील मच्छीमारांनी वेळीच धाव घेत बुडणाऱया नौकेवरील 17 खलाशांचे प्राण वाचविले होते. या अपघातात मासेमारी नौका, जाळी, इंजिन, खलाशांचे सामान मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. दुसरी घटना 26 ऑगस्ट 2020 रोजी पहाटे घडली होती. यातही गाळातील कचरा पातीच्या पंख्यात अडकल्याने इंजिन बंद पडून नस्तावर लाटांच्या तडाख्यात सापडून पात उलटली होती. यात सुदैवाने पाच मच्छीमार बचावले होते. यातही पातीचे इंजिन, जाळय़ांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आजही नौका अडकून पडण्याची दुर्घटना घडली असून मच्छीमारांच्या सतर्कतेने मोठी हानी टळली आहे.
आचरा बंदराचे नस्त बनले धोकादायक
आचरा बंदराचे नस्त दिवसेंदिवस गाळाने भरत चालले आहे. येथील मच्छीमारांना मासेमारीला जाताना भरती-ओहोटीच्या वेळा साधाव्या लागत आहेत. एका बाजूला खडकांची रांग, तर दुसऱया बाजूला साठलेला गाळ यामुळे समुद्रातून येताना-जाताना मच्छीमारांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही नौकाही यापूर्वी खडकांवर आदळून फुटण्याचे प्रकारही घडले आहेत. आचरा मच्छीमार मेरीटाईम बोर्डाकडे वारंवार हा गाळ उपसा करण्याची मागणी करत आहेत. मात्र, मेरीटाईम बोर्ड याकडे दुर्लक्ष करत आहे.
शासनकर्ते लक्ष देणार काय?
मच्छीमार बांधवांनी आचरा बंदरातील गाळ काढण्यासाठी पत्राद्वारे लक्ष वेधून वारंवार मागणी केली. या नस्तावर साचणारा गाळ रोखण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी काही पर्याय सूचविले आहेत. परंतु, शासन व राजकीय पुढाऱयांच्या उदासीनतेमुळे अजूनही परिस्थिती जैसे थे असल्याने मच्छीमारांचा जीव धोक्यात येऊ लागला आहे. त्यामुळे शासनकर्ते या समस्येकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.