मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पुनरुच्चार : विकासकामांच्या पूर्णत्वाचाही घेतला आढावा : सर्व कामे 19 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
प्रतिनिधी / पणजी
विधानसभा निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागु होण्याअगोदर 10 हजार रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असून 8 हजार जणांना रोजगार देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु आहे. पुढील आठवडय़ात आणखी दीड ते दोन हजार रोजगारांसाठीची प्रक्रिया सुरु करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरुवारी सायंकाळी पर्वरी येथे पत्रकारांना दिली.
विविध खाते प्रमुखांबरोबर आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विकासकामांचा व विकासप्रकल्पांचा आढावा घेतला.
सर्व कामे 19 डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार
राज्य सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतलेले आहेत. त्या सर्व फाईल्स सज्ज ठेवा. 19 डिसेंबरपर्यंत होईल तेवढय़ा प्रकल्पांसाठीची पायाभरणी झाली पाहिजे. जे प्रकल्प प्रलंबित आहेत त्या सर्व प्रकल्पांची बांधकामे पूर्ण करुन त्या प्रकल्पांची उद्घाटनेदेखील 19 डिसेंबरपर्यंत उरकून घ्यावयाची आहेत. त्या दृष्टीकोनातून तातडीने पावले उचलण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अनेक खात्यांमध्ये नोकरभरतीची प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. युद्धपातळीवर ही प्रक्रिया सुरु करा त्यासाठी विविध खात्यांनी तातडीने नोकरभरतीसाठी आवश्यक त्या सर्व मान्यता द्याव्यात व मिळवून घ्याव्यात असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
दहा हजार नोकऱयांचे आश्वासन पूर्ण करणार
आतापर्यंत 7500 ते 8 हजार जागा भरण्यासाठीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. काही खात्यांमध्ये मुलाखती देखील चालू झालेल्या आहेत. पुढील आठवडय़ाभरात आणखी दीड ते 2 हजार रोजगार भरतीसाठीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून ही प्रक्रिया देखील निवडणुका जाहिर होण्याअगोदर म्हणजेच आचारसंहिता लागु करण्यापूर्वी पूर्ण केली जाईल, असे ते म्हणाले. आपण स्वतः दहा हजार जणांना रोजगार देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहे असे ते म्हणाले.
आमदार, मंत्र्यांच्याकडे युवकांची गर्दी
दरम्यान सध्या राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये नोकरभरतीसाठी जाहिराती देणे सुरु झालेले आहे. या नोकऱयांसाठी अर्ज करणाऱया युवक-युवतींची धावपळ सुरु आहे. आमदार, मंत्री किंवा नोकरी मिळविण्यासाठी मदत करु शकणाऱया नेत्यांच्या घरी किंवा कार्यालयांमध्ये सध्या युवक-युवतींची गर्दी होत आहे. केंव्हा एकदा नोकऱयांची जाहिरात प्रसिद्ध होतेय, याची वाट बेरोजगार असलेले पाहत आहेत. दर दिवशी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध होत असल्याचे दिसून येते. काही खात्यांमध्ये नोकरभरतीसाठी परीक्षा, मुलाखतीही सुरु आहेत. येत्या काही दिवसांत नोकरभरतीची गती वाढण्याची शक्यता आहे.