आज पंधरा ऑगस्ट. 1947 साली देश स्वतंत्र झाला. ज्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी मोगल, डच, फ्रेंच, ब्रिटिश यांच्या जुलमी राजवटीविरुद्ध जीवाची पर्वा न करता संघर्ष केला, बलिदान दिले, त्यांच्या त्यागाचे फळ म्हणजे आजचा दिवस. वर्ष दोन वर्षे नाही तर हजार बाराशे वर्षापासूनचा हा राष्ट्राभिमानाचा विजय आहे. सशस्त्र, क्रांतीचा मार्ग असो वा अहिंसक मार्गाचा अवलंब असो, हा सर्वांचा त्याग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर असोत वा योगी अरविंद असोत, दु:खाने का असेना त्यांनी खंडित स्वातंत्र्याचे स्वागत केले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा देशातील अनेक भागात मग तो भाग काश्मीर असो वा नागालँड तेथे वास्तव्य करणारी जनता नावाला भारतीय गणराज्यात होती परंतु त्यांना आपण काही वेगळे आहोत अशी भावना होती. ही भावना जास्त प्रमाणात काश्मीर प्रांतात होती. भारतीय लोकांनादेखील हा प्रांत केक्हा जाईल याची शाश्वती वाटत नव्हती. परंतु गेल्या पाच सहा वर्षात त्यांना राजकीय व राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले. आपण भारतीय आहोत, हे संपूर्ण राष्ट्र आपले आहे, त्याचे आपण घटक आहोत, काश्मीर त्याला अपवाद नाही हे संस्कार करण्यात सरकार यशस्वी झाले. काश्मीरमधील तरुणांना दोष देता येणार नाही. अशा प्रकारचे शिक्षण वा जाणीव त्यांना करून देण्यात आली नाही. आज सर्वत्र तिरंगा अभिमानाने फडकताना दिसत आहे. तरुणांच्या हातातील दगडांचे, शस्त्रांचे रूपांतर लेखणीत झाले आहे. राष्ट्रासाठी पोलीस दलात, सैन्यात तरुण-तरुणी सामील होत आहेत. सीमेवरील जनता फुटिरवाद्यांना सहाय्य करीत नाही. 26 जानेवारी असो वा 15 ऑगस्ट, आजचा काश्मिरी तरुण ‘भारत माता की जय’चा उद्घोष करीत आहे. या वर्षीचा 15 ऑगस्ट आगळा वेगळा आहे, कारण तो हे संपूर्ण राष्ट्र माझे आहे या भावनेने काश्मिरी तरुण-तरुणींनी भारावून गेला आहे.
135 कोटी जनता आपण एका राष्ट्राचे घटक आहोत. समाजाच्या सुख दु:खाशी एकरूप होण्याची भावना जातपातीच्या दऱया विसरून एकरूप झालेल्या दिसतात. उत्तर प्रदेशातील गोरखपूर गावानजीक रेल्वे अपघात झाला. गावापासून दूर अंतरावर हे ठिकाण होते. त्याच गावातील मदरसातील विद्यार्थी सहलीसाठी गेले होते. लोकांचा आवाज, किंकाळय़ा त्यांनी ऐकल्या व कुतूहल म्हणून तेथे गेले. प्रवासी अडचणीत आहेत हे दिसताच त्यांनी त्या गावातील मौलवींना ही घटना कळविली. लागलीच अन्य काही सहकाऱयांना घेऊन मदतीसाठी ते त्या ठिकाणी धावले व मदतकार्य सुरू केले. थोडय़ाच वेळात ही बातमी तेथील संघ स्वयंसेवकांना समजली व मदतीसाठी त्यांनीही धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की काही मुस्लीम बांधव मदत करीत आहेत. त्यांनी प्रमुख मौलवीना विनंती केली की आम्हाला तुमच्याबरोबर काम करण्याची परवानगी द्यावी. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी संघ स्वयंसेवकांना सहभागी होण्यास सांगितले. राष्ट्रीय एकात्मतेचा तो एक सुखद प्रसंग होता.
कोरोनाचा प्रसार संपूर्ण जगभर झाला आहे. त्याला भारत अपवाद नाही. केरळ राज्यात कम्युनिस्ट राजवट आहे. कम्युनिस्ट आणि संघ विचारसरणी म्हणजे मुंगूस सापाची जात. (या प्रसंगात कुणीही साप नाही तर कुणीही मुंगूस नाही) परंतु याप्रसंगी केरळमधील कम्युनिस्ट विचारसरणीचे मुख्यमंत्री पी. विजयन यानी संघ स्वयंसेवकांना बरोबर घेऊन कोरोनाशी सामना करीत आहेत. काही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. मुख्यमंत्र्यांनी विरोध करणाऱया कार्यकर्त्यांना पक्षातून काढले व एकोप्याने सर्वांशी चांगले संबंध ठेवले. असे प्रसंग गेल्या पाच सहा वर्षात अनेक ठिकाणी दिसत आहेत म्हणून हा 15 ऑगस्ट आगळा वेगळा.
‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे?’ ही रामदासांची शिकवण राज्यकर्त्यांना आहे आणि त्याचा अनुभव नुकताच लडाखमधील गलवान भागात सीमा रेषेनजीक पहावयास मिळाला. गेल्या सत्तर वर्षात चीन पाकिस्ताननी डोळे वटारायचे व भारतीय सेनेने गपगुमान मान खाली घालायची. परंतु 1962 चा भारत आज राहिलेला नाही. चिनी सैन्यांचीच नव्हे तर चिनी राज्यकर्त्यांची झोप उडवणारा कर्नल संतोष बाबू व त्यांच्या इतर सैनिक साथीदारांनी केलेला अतुल पराक्रम. हातात शस्त्र नाही. (दोन्ही लष्कराकडे शस्त्र असता कामा नये, असा करार शरद पवार संरक्षण मंत्री असताना झाला आहे.) परंतु चिनी जवानांच्या हातात कुंपणाची वायर बांधलेल्या काठय़ा. त्यांनी भारतीय जवानांवर त्याचा वापर केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून कर्नल संतोष बाबू यांनी आपल्या हातातल्या काठय़ा व त्यांच्याच काठय़ा हिसकावून प्रतिकार केला. संतोष बाबूसह अन्य वीस जवान हुतात्मा झाले. परंतु त्या मारामारीत साधारणपणे पन्नास चिनी सैनिकांना यमसदनाला पाठविल्याची बातमी परदेशातील सूत्रांनी दिली आहे.
संतोषबाबूंना माहीत होते की सरकार राष्ट्रभक्त सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. डोळय़ाला डोळा भिडवून प्रतिकार करण्यास मुभा आहे. अजूनही चीनने आपले किती सैनिक मारले गेले हे जगाला सांगितले नाही. चीनसारख्या जागतिक दादाची मान पकडण्याची ताकत भारतीय लष्करांच्या जवानात आहे हे जगाने पाहिले. हा आहे आजचा हिंदुस्थान. बुधवार दि. 28 जुलै 2020 रोजी दुपारी 3 वा. 11 मिनिटांनी भारताच्या इतिहासात नवीन युगाला सुरुवात झाली. त्या क्षणाचे वर्णन पंतप्रधान मोदीनी ‘राष्ट्र रक्षा समंपुण्यम। राष्ट्र रक्षासमं व्रतम। राष्ट्ररक्षा समं यज्ञ। दृष्टोनैवेच नैवच । नभा: स्टशं दीप्तम् -स्वागतम्।
हे युग आहे राफेल विमानांचे. भारतभूमीवर पाच वैमानिकांनी केलेला भारत स्पर्श. आपल्याच वैमानिकांनी आणलेली विमाने. 135 कोटी भारतीयांनी त्याचे स्वागत केले, म्हणून हा आगळा वेगळा पंधरा ऑगस्ट.
5 ऑगस्ट 2020 हा दिवस उजाडण्यास किती दिवस, किती वर्षे लागली? 25 मे 1885 रोजी महंत रघुवीरदास यांनी राममंदिराचा पहिला खटला फैजाबाद जिल्हा न्यायालयात दाखल केला. निर्णय झाला 9 नोव्हेंबर 2019 रोजी. म्हणजे साधारणपणे 134 वर्षे न्याय मिळण्यासाठी एक खटला कोर्टात चालू होता. गिनिज बुकात नोंद झाली असावी. भारतच नव्हे तर संपूर्ण जगतातील भारतीयांच्या मनातील एक शल्य सतत बेचैन करीत होते. गरीब असो वा श्रीमंत, त्याला वाटत होते आपल्या जीवनातील ही एक मोठी भळभळती जखम आहे आणि ती दि. 5 ऑगस्ट रोजी थांबलेली असेल. रामजन्म भूमीला आता वादग्रस्त म्हणता येणार नाही कारण ती जागा रामजन्म भूमीचीच आहे, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
22 किंवा 23 डिसेंबर 1949 रोजी एक चमत्कारिक घटना रामजन्मभूमीत घडली. त्या काळात हिंदू व मुस्लीम समाजाला धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी देण्यात आली होती. दोघांचेही रखवालदार रात्री त्या ठिकाणी असत. अब्दुल बरकत हा एक त्यातला रखवालदार. त्याचीही साक्ष कोर्टात होत असे. त्यांनी एकदा न्यायमूर्तीना शपथेवर सांगितले की, मी त्या रात्री बाबरी मशिदीतून एक प्रकाश आलेला पाहिला आणि त्या दैवी प्रकाशात एका गोड बालकाचा चेहरा दिसला. आणि त्या एका साक्षीवर न्यायमूर्ती के. के. नायर यांनी 29 डिसेंबर 1949 रोजी सदर जागा ही विवादास्पद आहे असा निकाल दिला. त्याचा विचार करणे आवश्यक आहे.
सर्व बाजूनी विचार करून मिळालेल्या पुराव्यावरून इसवीसन पूर्व 105 पासून ग्रीक राजा मिनंदर-गझनीचा महमद बाबर ते औरंगजेबाने केलेल्या उपद्रवाचे ग्रहण 5 ऑगस्ट रोजी सुटले आहे. या दिवशी जगातील रामभक्तांच्या आनंदाचे वर्णन करणे हे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माउलींनादेखील कठीण होईल. हे मंदिर फक्त दगडांचे नसेल, राम मंदिर म्हणजे देशाची अस्मिता आहे. राजधर्माचे प्रतीक आहे. जनमतांचा आदर करताना स्वत:च्या पत्नीचादेखील त्याग करावा लागतो हे राजाचे कर्तव्य आहे, हा एक आदर्श आहे. प्रचंड इच्छाशक्तीचा हा विजय आहे. 1947 नंतर दरवषी 15 ऑगस्ट हा दिवस येतच आहे. परंतु आजचा 15 ऑगस्ट आगळा वेगळा आहे. कारण कोटी कोटी देशवासियांच्या ‘जय श्रीराम’ या घोषणेला खरा अर्थ प्राप्त झाला आहे.
शारदाचरण कुलकर्णी, बेळगाव