वाळपई / प्रतिनिधी
जून महिन्यात उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी चोर्ला घाट परिसरातून अवजड वाहनांना बंदी घातली होती. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याकडे सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले होते. अवजड वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याने या महामार्गाची पूर्णपणे चाळण झालेली आहे. यासंदर्भात तरुण भारतने आवाज उठविल्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी आता पुन्हा 1 नोव्हेंबरपासून अवजड वाहनांना बंदी घातली असून त्याची अंमलबजावणी आज मंगळवारपासून कडकपणे होणार आहे.
यासंदर्भातील एक महत्त्वाची बैठक काल सोमवारी सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला सत्तरी तालुक्मयाचे मामलेदार दशरथ गावस यांनी वाळपई पोलीस व वाहतूक खात्याला कडक निर्देश देताना अवजड वाहतूक झाल्यास कारवाई करण्याचा आदेश दिला.
वाळपई पोलीस निरीक्षक, डिचोली पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस निरीक्षक, वाहतूक खाते, सार्वजनिक बांधकाम खात्याचे वाळपई अभियंते हजर होते. बेळगाव भागातून गोव्याकडे येणारी अवजड वाहने सुरला याठिकाणी अडविण्यात येणार असून त्यांना गोव्यात येण्यासाठी प्रतिबंध करण्यात येणार आहे. गोव्यातून बेळगावच्या दिशेने जाणारी अवजड वाहने होंडा व साखळी विठ्ठलापूर या ठिकाणी अडविण्यात येणार आहेत. यासाठी पोलिसांची खास नियुक्ती करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी आज मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. अवजड वाहनांना बंदी असल्याची सूचना देणारे फलक दोन दिवसात लावण्यात येणार असल्याची माहिती वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांनी दिली. मामलेदार दशरथ गावस यांनी सांगितले की उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांच्या निर्देशानुसार ही बैठक घेण्यात आली.