सायंकाळी 5 पर्यंत चालणार व्यवहार, नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
सोमवार दि. 21 जूनपासून बेळगाव शहर व जिल्हय़ात अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. पहाटे 6 ते सायंकाळी 5 पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली असून या काळात बससेवाही सुरू असणार आहे. मात्र, अनलॉक झाला आहे म्हणून नागरिकांनी जर पुन्हा गर्दी केली तर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कायम आहे, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व व्यवहार सुरू असणार आहेत तर शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत विकेंड लॉकडाऊन असणार आहे. अनलॉक करतानाही खबरदारी घ्या, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. डॉ. देविप्रसाद शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने तर तिसऱया लाटेचा इशारा दिला आहे.
नागरिकांनी सरकारने जारी केलेली मार्गसूची पाळावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे. सोमवारी सकाळपासून हॉटेल, दुकाने, बससेवा, क्यायामशाळा, कारखाने, ऑटोरिक्षा, लॉज, रेस्टॉरंट सुरू होणार असली तरी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
राज्य सरकारने अनलॉकसाठी जारी केलेली नवी मार्गसूची 5 जुलैपर्यंत लागू असणार आहे. कारखान्यात कामगारांची संख्या किती असावी, हॉटेल-बारमध्ये किती ग्राहकांना प्रवेश द्यावा? आदी नियमावली सरकारने जाहीर केली आहे. सर्व दुकाने सायंकाळी पाचच्या आत बंद करावीत, असेही आवाहनही पोलीस उपायुक्तांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरांमध्ये बॅरिकेड्स उभारण्यात आली होती. सोमवारपासून प्रमुख रस्त्यांवरील बॅरिकेड्स हटविण्यात येणार आहेत. सायंकाळी 5 नंतर बॅरिकेड्स पुन्हा उभारण्यात येतील, असेही पोलीस उपायुक्तांनी सांगितले. कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मास्क व सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर याचा विसर पडू नये. नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.