बँका बंद तर एटीएम सुरू, कृषी विषयक दुकाने राहणार खुली :नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना थोपविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरूच आहेत. सध्या बेळगावसह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. तरीही रुग्णसंख्येत वाढच होत आहे. या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन तीन दिवसांचा करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच बेळगावसह संपूर्ण जिल्हय़ात कडक लॉकडाऊन असणार आहे.
नेहमीप्रमाणे दवाखाने, औषध दुकाने, दूध विक्री सुरू असणार आहे. न्यायालयेही सुरू असणार आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विषयक साहित्य विक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. बियाणे, औषधे, खते सहजपणे उपलब्ध व्हावीत यासाठी ही दुकाने उघडी ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
या संबंधी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्याशी संपर्क साधला असता लसीकरणासाठी नोंद केलेल्यांना लॉकडाऊनच्या काळातही जाता येणार आहे. त्यांना मुभा असणार आहे. बँका बंद असणार असून एटीएम सेवा सुरू असणार आहे. याबरोबरच पार्सल फुड सर्व्हिसही सुरू असणार आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या हितासाठीच लॉकडाऊन आहे. प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले आहे.
गेले दोन आठवडे केवळ शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेवून तीन दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून
शुक्रवारी सकाळपासून सोमवारी सकाळी 6 पर्यंत बेळगावसह संपूर्ण जिल्हय़ात कडक लॉकडाऊन असणार आहे. या काळात उपचारासाठी इस्पितळांना जाणाऱयांना मुभा आहे.
मात्र या तीन दिवसांच्या काळात नागरिकांनी अनावश्यकपणे रस्त्यावरुन फिरु नये, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले आहे.
राजधानी बेंगळूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. गेल्या 15 दिवसांपासून बेळगाव जिल्हय़ात मात्र रोज 1 हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम जाणवत आहे. सरकारी व खासगी इस्पितळे कोरोनाबाधितांनी तुडुंब भरली आहेत. रुग्णसंख्येत घट झाली नाही तर समस्या आणखी गंभीर होणार आहे म्हणून नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.