बेळगाव :\ प्रतिनिधी
कोरोनामुळे लॉकडाऊन जारी झाल्याने सर्वच व्यवसाय, उद्योगधंदे बंद झाले होते. याला परिवहन मंडळ देखील अपवाद नाही. गेल्या 22 मार्चपासून बंद असलेली बससेवा मंगळवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
लॉकडाऊनमुळे साधारण 20 मार्चपासून राज्य परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बस जाग्यावर थांबून आहेत. स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या सर्व बसेस बंद होत्या. त्यामुळे परिवहन मंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंडळाने काही नियम केले असून ते पाळूनच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमानुसार एका बसमध्ये 30 जणांना प्रवास करता येणार आहे. बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे. त्याबरोबर बसस्थानकात प्रवेश करणाऱया प्रत्येक प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग करून तपासणी केली जाणार आहे. शहरात कॅन्टोन्मेंट झोन वगळता सर्व ठिकाणी बसेस धावणार असून प्रवाशांची संख्या व परिस्थिती पाहून बसेसची संख्या वाढण्यात येणार आहेत.
प्रवासादरम्यान बसचालक, बसवाहक यासह प्रवाशांनी मास्क घालणे, बसमध्ये चढतेवेळी हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे बंधनकारक आहे. बसस्थानकातून बस निघण्यापूर्वी व बसस्थानकात पोहोचल्यानंतर सॅनिटाईज केली जाणार आहे. खबरदारी म्हणून दररोज सॅनिटायझरचा वापर करून बसस्थानक निर्जुंकीकरण करण्यात येणार असून जिल्हय़ात एकूण 252 बस धावणार आहेत.
परिवहन मंडळाच्या बसेस गेल्या कित्येक दिवसांपासून बंद होत्या. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांविना सुनसुने झाले होते. मात्र मंगळवारपासून पुन्हा एकदा बसस्थानक गजबजणार आहे. बसस्थानकात प्रवाशांनी सुरक्षित अंतर राखावे, यासाठी सोमवारी मार्किंग करण्यात आले. दरम्यान बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे धोका उद्भभवू शकतो. यासाठी परिवहनने विविध उपाय आखले आहेत.
सर्व निगम महामंडळामध्ये 1 लाख 20 हजार कर्मचारी काम करतात. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व कर्मचारी घरी बसून होते. मात्र आता बससेवा सुरू झाल्याने परिवहनमध्ये सेवा बजावणाऱया बसचालक, कंडक्टर व तांत्रिक कर्मचाऱयांना कामावर रूजू व्हावे लागणार आहे.