प्रतिनिधी / बेळगाव
ऑनलाईन, ऑफलाईन आणि विद्यागमच्या माध्यमातून सुरू झालेल्या शिक्षणवारीला पूर्णविराम मिळाला असून सोमवार दि. 1 फेब्रुवारीपासून नववी व दहावीचे वर्ग नियमित पूर्णवेळ भरणार आहेत. शिक्षणमंत्र्यांनी याबाबतचा आदेश जाहीर केला असून त्यानुसार पूर्णवेळ वर्ग सुरू करण्याबाबतची मार्गदर्शक प्रणाली शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे नववी आणि दहावीचे वर्ग सकाळी 10 ते 4.30 या वेळेत भरविण्यात येणार आहेत. यामुळे कोरोनानंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शैक्षणिक वारी सुसाट धावणार आहे.
1 जानेवारीपासून दहावीच्या वर्गांना सुरुवात झाली होती. नववीला विद्यागमच्या माध्यमातून एक दिवसाआड अध्यापन केले जात होते. मात्र, तीन-चार तासांचे वर्ग न घेता नियमित पूर्णवेळ शाळा भरविण्याचा आदेश जारी करत त्यानुसार सोमवारपासून इ. 9 वी व एसएसएलसीचे विद्यार्थी पूर्वीप्रमाणे शाळेच्या वेळेत पूर्ण दिवस हजर राहणार आहेत. अर्थात यासाठी विद्यार्थ्यांना हजेरी सक्तीची करण्यात आलेली नाही. ऑफलाईन वर्गाबरोबरच ऑनलाईन वर्गदेखील सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक प्रणालीत सोमवार ते शुक्रवार पाच दिवस पूर्णवेळ म्हणजेच 10 ते 4.30 या वेळेत नववी व दहावीचे वर्ग भरणार आहेत. शनिवारी सकाळी 10 ते 12.30 या वेळेत वर्ग चालणार आहेत. विद्यागमअंतर्गत इ. 8 वीचे वर्ग सोमवार, बुधवार, शुक्रवार या वेळेत 10 ते 12.30 या वेळेत भरविण्यात येतील. शनिवारी विद्यार्थ्यांना सुटी असेल, असे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहताना दुपारचे जेवण आणि पाण्याची बाटली सोबत आणणे आवश्यक आहे. शिवाय कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करताना मास्क, सॅनिटायझर्स व सामाजिक अंतराचे भान राखणे आवश्यक आहे.
शाळा परिसर पूर्ण दिवस गजबजणार
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संकटाने डोके वर काढले. परिणामी या घटनेला वर्ष होत आहे. तेव्हापासून शाळा परिसरात शुकशुकाटच आहे. टप्प्याटप्प्याने ऑनलाईन तसेच विद्यागम सुरू असले तरी विद्यार्थ्यांची शाळेत पूर्णवेळ उपस्थिती नव्हती. 1 फेब्रुवारीपासून दोन वर्ग नियमित सुरू राहणार असल्याने शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजणार आहे.
पालकांचे संमतीपत्र आवश्यक
नववी-दहावीचे वर्ग पूर्णवेळ भरविण्यात येणार असले तरी या वर्गांना उपस्थित राहण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी दररोज वर्गांना हजर राहावे अशी सक्ती करण्यात आली नसून सोयीनुसार ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. सामाजिक अंतराचे भान राखताना एका वर्गात विद्यार्थ्यांची गर्दी होता कामा नये, यासाठी वर्गांचे विभाग करून एका वर्गात 20 ते 25 विद्यार्थी बैठकीची व्यवस्था करावी, असे नोंदविण्यात आले आहे.