19 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थी जाणार शाळेत : गणवेश-शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग
प्रतिनिधी /बेळगाव
राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर सोमवार दि. 25 पासून पहिली ते पाचवीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग सुरू होणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा प्राथमिक शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. तब्बल 19 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेमध्ये दाखल होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्कंठा वाढली आहे.
कोरोनाचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्य सरकारने शाळा- महाविद्यालये सुरू केली. प्रारंभी महाविद्यालय त्यानंतर पदवीपूर्व, उच्च माध्यमिक, त्यानंतर माध्यमिक वर्ग सुरू करण्यात आले. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका विद्यार्थ्यांना असल्याने प्राथमिक वर्ग सुरू करण्यास काहीसा विलंब होत होता. परंतु कोविड टास्कफोर्स कमिटीच्या शिफारशीनुसार पहिली ते पाचवीचे वर्ग 25 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
विद्यार्थ्यांना उपस्थिती सक्तीची नाही
प्राथमिक शाळा सुरू होणार असल्याने मागील 15 दिवसांपासून शिक्षकांना शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले. शाळांची स्वच्छता करण्यात आली. 25 पासून प्राथमिक शाळा जरी सुरू होत असल्या तरी वर्गामध्ये उपस्थित राहणे हे सक्तीचे राहणार नाही. सुरुवातीचे पहिले पाच दिवस सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेतच वर्ग भरविले जाणार आहेत. त्यानंतर 2 नोव्हेंबरपासून पूर्णवेळ शाळा भरविली जाणार असून, त्यांना मध्यान्ह आहारही दिला जाणार आहे.
गणवेश- शैक्षणिक साहित्यासाठी लगबग
सोमवारपासून पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याने गणवेश खरेदीसाठी रेडिमेड कपडय़ांच्या दुकानांसमोर नागरिकांची गर्दी झाली होती. ज्या ठिकाणी गणवेश उपलब्ध होतात अशा दुकानांसमोर पालकांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने नोकरदारांनी घराबाहेर पडत आपल्या पाल्यासाठी नवीन गणवेश, बॅग, शैक्षणिक साहित्य यांची खरेदी केली. यामुळे शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात मात्र गर्दी झाली होती.
शाळांमध्ये आधीपासूनच तयारी
पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार असल्याने शाळांमध्ये आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्क्रिनिंग तसेच मास्कचा वापर करण्याची सूचना विद्यार्थी व पालकांना करण्यात आली असल्याचे मराठी शाळा क्र. 6 च्या शिक्षिका जयश्री पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.