कोल्हापूर, सातारा वगळता इतर भागात बससेवेला होणार प्रारंभ : नियमांचे पालन बंधनकारक
प्रतिनिधी / बेळगाव
संप आणि लॉकडाऊनमुळे मागील दीड महिन्यांपासून ठप्प झालेल्या कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे.
कोल्हापूर व सातारा जिल्हा वगळून मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, मिरज, तुळजापूर या शहरांकडे बसेस धावणार आहेत, अशी माहिती विभागीय नियंत्रण अधिकारी एम. आर. मुंजी यांनी दिली. शिवाय आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांसह बससेवा सुरू होणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 6 पासून महाराष्ट्रातील विविध भागात लांब पल्ल्यासाठी बसेस धावणार आहेत.
संप व लॉकडाऊनमुळे बऱयाच काळासाठी कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद होती. त्यामुळे अत्यावश्यक गोष्टीसाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत होता. सोमवारपासून राज्यांतर्गत बससेवा सुरू झाली होती. मात्र, महाराष्ट्रात बससेवा सुरू नव्हती. आता शुक्रवारपासून कोल्हापूर व सातारा जिल्हा वगळता महाराष्ट्रातील इतर ठिकाणी धावणाऱया बसेसना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मार्गांवर कर्नाटक परिवहनच्या बसेस धावणार आहेत.
जिल्हय़ातील विविध आगारांतून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, मिरज, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर आदी शहरांकडे बसेस धावणार आहेत. बेळगाव विभागातील चार आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर, संकेश्वर, निपाणी, चिकोडी, गोकाक बस आगारांतून आंतरराज्य प्रवासासाठी बसेस धावणार आहेत. प्रवाशांना मास्क व सामाजिक अंतर ठेवूनच प्रवास करावा लागणार आहे.
उत्पन्न वाढण्यास होणार मदत
बेळगाव आगारातून कर्नाटक-महाराष्ट्रात असा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असल्याने उत्पन्न चांगले मिळते. मात्र, लॉकडाऊनमुळे राज्यांतर्गत बससेवेबरोबर कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा ठप्प होती. त्यामुळे परिवहनला फटका बसला होता. मात्र, आता महाराष्ट्रात बससेवा सुरू झाल्याने उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.