दीपक प्रभावळकर / सातारा :
भारतीय संस्कृतीची आद्यविद्या कुस्तीचा इतिहास रामायणकलीन असून, मल्लविद्या केवळ ताकदीची नसून मन-मेंदू-मनगटाचा घमासान होय. स्वराज्याच्या मातीतल्या कुस्तीला खरा राजाश्रय मिळाला तो महाराष्ट्र केसरीच्या रूपाने. महामारीच्या कालखंडानंतर हिंदकेसरीसह आंतरराष्ट्रीय रेसलिंगला आव्हान देणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी आजपासून साताऱ्यात शड्डू घुमणार आहे.
64 व्या महाराष्ट्र केसरीसाठी घामाच्या ओघळात मातीचा धुरळा उडवून गादीच्या कसरती दाखवेल तोच मानाच्या गदेचा मानकरी ठरणार आहे. यासाठीची साताऱ्यातील जय्यत तयारी पूर्ण झाली असून करोड शौकिनांची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. दोन वर्षाच्या गॅपनंतर ही स्पर्धा होत असल्याने साताऱ्यात गर्दीचे उच्चांक मोडले जाण्याचा अंदाज बांधला जात आहे
दरम्यान, साताऱ्यात संभाव्य मानकऱ्यांसह मल्ल, प्रशिक्षक, पंच आणि कुस्ती शौकिनांचे जत्थेच्या जत्थे दाखल होऊ लागले असून, सोमवारच्या रात्री शाहू स्टेडियम परिसरात मैदानाचा दिवस कधी उजाडला याचंही कोणाला भान उरलेले नाहीये.
पुण्याच्या पैलवान मामासाहेब मोहोळांच्या संकल्पनेला बळ दिले ते यशवंतराव चव्हाण आणि लोकनेते सातारच्या सुपुत्रांनी. मात्र, त्यांच्या पश्चात साताऱयात ही स्पर्धा आलीच नाही. गेल्या 63 वर्षात सर्वाधिक गदा मिळवण्यात पुण्यापाठोपाठ सोलापूरचा विक्रम आहे. साताऱयाने पाच गदा खेचून आणल्या. पैलवान खाशाबा जाधव श्रीरंग आप्पा जाधव अशी राष्ट्रीय परंपरा जोपासत पुन्हा राजधानी मर्दानी खेळासाठी सजलीय.
साठ वर्षानंतरही पुन्हा तेच
चव्हाणसाहेबांसह लोकनेत्यांसोबत ६० वर्षांपूर्वी आयोजन करणारे साहेबराव पवार हेच यंदाचे आयोजक आहेत, हे सर्वात वैशिष्ठ्यपूर्ण
आहे. येथील शाहू स्टेडियमला क्रिकेटच्या लॉर्डचं किंवा लॉनटेनिसच्या विम्बल्डनचं रूप आलं आहे. रणरणत्या उकाड्यात सूर्य आग ओकत असला तरी हनुमानभक्तांची ही यात्रा आता त्यालाही रोखणं अशक्य आहे. स्पर्धेला
९०० मल्लांच्या ९८० कुस्त्या होणार असून त्यासाठी १२० पंच, हजारो प्रशिक्षक तर ५५ हजार प्रेक्षकांसाठी तामझाम करण्यात आला आहे. कुस्तीचा खरा बेल्ट असलेल्या पुणे, कोल्हापूर, सोलाापूर, सांगली, सोलापूर यांच्या मध्यवर्ती ठिकाणी या स्पर्धेला ऐतिहासिक गर्दी लोटणार असल्याचा अंदाज येत्या चारच दिवसांत
सत्यात उतरणार आहे.
कोण आहे प्रबळ दावेदार?
किरण भगत, अक्षय शिंदे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदंगीर, गणेश जगताप, कौतुक
डाफळे, आर्दश गुंड, सूरज निकम हे यंदाचे प्रबळ दावेदार असले तरी वजनी गटातल्या कुस्त्या झाल्यावर पडणाऱ्या लॉटमध्ये अंतिम चित्र समोर येणार असले तरी हे सगळेच कसले असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत थरार लांबणार असून त्यासाठी शनिवारची रात्रच यावी लागेल.
दोन्ही राजेंच्या शिवाय राजधानीत ताकदीचा खेळ
सातारा म्हंटलं तर दोन राजेंचं राजकारण चर्चेला येतं. त्यांच्याशिवाय इथं पान सुद्धा हालत नाही, अशी राज्यभर चर्चा होत असली तरी खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांना तसूभरही संयोजनात हा
तामझाम उभारत आहे. सहाजिकच थोरल्या पवारांच्या आशिर्वादाने हे होत असलं तरी दोन्ही राजेंच्या शिवाय…’ असं नषं चित्र तयार होत आहे.